कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे.
याला उत्तर देताना कर्नाटक सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. थिम्मापूर यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने पूर येईल, या महाराष्ट्राच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे बागलकोट येथे बोलताना नुकतेच स्पष्ट केले आहे.
यामुळे महाराष्ट्र काहीही म्हटले तरी कर्नाटक सरकार अलमट्टी धरणातील पाणी पाच मीटर अधिक उंचीने अडवण्यावर ठाम असल्याचे पुढे आले आहे. यासाठी कर्नाटक सरकार सध्या निधीचे नियोजन करीत आहे.
अलमट्टी धरणात केंद्र शासन आणि कृष्णा पाणी तंटा लवादाच्या आदेशानुसार ५१९.६० मीटरपर्यंतच पाणीसाठा केला जातो.
पण, सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी आणि बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटक सरकारने ५२४ मीटर उंचीपर्यंत पाणी साठवण्याचे नियोजन केले आहे.
केंद्र शासन आणि लवादाने धरणातील पाणी ५२४.६० मीटर उंचीपर्यंत साठवण्यास परवानगी दिली आहे, असे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. मात्र अजून इतक्या उंचीवर पाणी साठवण्याच्या निर्णयाचे केंद्राकडे नोटीफिकेशन निघालेले नाही.
महाराष्ट्राने यापूर्वी उंची वाढवण्यावर आक्षेप घेतलेला नाही. आताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे. पण आम्ही ५२४ मीटरपर्यंत पाणी साठवणार आहे.
इतके पाणी साठवल्यानंतर महाराष्ट्रात पूर येणार नाही, असा दावाही कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे.
बुधवारी बागलकोट जिल्ह्यात उत्पादन शुल्क मंत्री थिम्मापूर म्हणतात, धरणात अधिक पाणी अडवल्याने महाराष्ट्रात पूर येणार नाही, हे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. आम्ही तांत्रिक माहिती, त्याचे परिणाम महाराष्ट्रास सांगण्यास तयार आहोत.
कोल्हापूर ५४६ मीटर उंचीवरअलमट्टी धरण उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर आहे. त्याचे बांधकाम २००५ साली पूर्ण झाले. त्याची उंची ५२४.२६ मीटर आहे. धरण कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणाची जलधारणक्षमता १२३.०८ टीएमसी इतकी आहे. धरण समुद्रसपाटीपासून ५१९ मीटर उंचीवर आहे. कोल्हापूर ५४६ मीटर उंचीवर आहे, असा अभ्यासकांचा दावा आहे.
अहवालानंतर भूमिकाअलमट्टी धरणातील पाणी फुगवट्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होते का याचा अभ्यास रूरकी येथील भारतीय जलविज्ञान संस्थेकडून सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतरच पुढील भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार आहे.
अधिक वाचा: बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर