खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना युरिया व डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) च्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाचा युरिया हा केवळ कागदावर असून, शेतात मात्र ठणठणाट पहावयास मिळत आहे. महिना झाला युरिया, तर तीन महिने झाले 'डीएपी' नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना घालायचे तरी काय? असा प्रश्न आहे.
यंदा वरुणराजाने खरीप हंगामाचे वेळापत्रकच बिघडून टाकले आहे. मान्सूनपूर्व पाऊस थांबत नाही तोपर्यंत मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे पेरण्या करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. साधारणतः आपल्याकडे उसाला जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात रासायनिक खतांचा 'मिरगी डोस' दिला जातो.
पाऊस जास्त सुरू होण्यापूर्वी खत पिकाला चांगल्या प्रकारे मिळावे, हा त्यामागील उद्देश असतो. मात्र, यंदा महिना झाला युरियाच नाही. त्याचबरोबर डीएपी नसल्याने मिश्रखतांचे उत्पादन पूर्णपणे थांबले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा दाखवला जातो. मात्र, प्रत्यक्षात शेतात एक किलोही मिळत नाही.
उत्पादनाला बसणार फटका
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस अधिक असल्याने वाढ होत नाही. त्यासाठी जून महिन्यात उघडझाप सुरू असते. यावेळी खताचा डोस दिला तर वाढ चांगली होते.
मात्र, या कालावधीतच खते नसल्याने यंदा उत्पादनाला फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ऐन खरीप हंगामात युरिया, डीएपी मिळत नसल्याने मोठे नुकसान होणार आहे. उसासह भात, भुईमूग पिकांचे उत्पादन घटणार आहे. - साताप्पा पाटील, संचालक, जय भवानी पाणीपुरवठा संस्था, आमजाई व्हरवडे.
'डीएपी' काय काम करते ?
१८% - नायट्रोजन
४६% - फॉस्फरस
डीएपी मध्ये असलेले हे घटक 'डीएपी'मध्ये साधारणपणे असते. यातील नायट्रोजन हा झाडांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक असतो, तर फॉस्फरस हा मुळांची वाढ, फळांची गुणवत्तावाढ आणि एकूणच उत्पादन क्षमतेसाठी महत्त्वाचा आहे.
आज मरा, उद्या धर्म करा
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा बफर स्टॉक करून ठेवला आहे. आज, पिकांना खते नाहीत आणि उद्या देऊन काय उपयोग? हा प्रकार म्हणजे 'आज मरा आणि उद्या धर्म करा' असेच म्हणावे लागेल.