सोलापूर : राज्यातील ९२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे ८६४ कोटी रुपये अडकवले असून, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी जवळपास १५५ कोटी थकविले आहे.
यंदा राज्याचा साखर हंगाम उसाअभावी लवकरच बंद झाला. सोलापूर जिल्ह्यात तर जानेवारीपासूनच साखर कारखान्यांचे पट्टे पडण्यास सुरुवात झाले होते.
साखर कारखाने बंद होऊन तीन-चार महिने झाले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे नाव कारखानदार घेत नाहीत.
वर्षभर पैसे खर्च करून जोपासलेला ऊस साखर कारखान्याला देताना ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना पैसेच मोजावे लागले. एवढे करूनही साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात नाहीत.
राज्यातील ९२ साखर कारखान्यांनी १५ मेपर्यंत ८६४ कोटी थकविले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी तब्बल १५५ कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत.
मागील वर्षी पाऊस चांगला पडल्याने यंदा उसाचे क्षेत्र जिल्ह्यातच वाढले आहे. या वाढलेल्या उसाची जोपासणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने कारखानदारांकडे हेलपाटे मारत आहेत.
मात्र, कारखानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरलेल्या गाळप हंगामात राज्यात २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते.
त्यापैकी १०८ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार ऊस उत्पादकांचे पैसे चुकते केले. २२ साखर कारखान्यांनी कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे ८६४ कोटी रुपये अडकवले आहेत.
पाच साखर कारखाने ६० टक्क्यांपर्यंतही रक्कम देऊ शकले नाहीत, तर आठ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. ७९ कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील थकबाकी
- जय हिंद शुगरने ३१ कोटी
- इंद्रेश्वर शुगर, सिद्धेश्वर प्रत्येकी २५ कोटी
- सिद्धनाथ शुगर २१.११ कोटी
- गोकुळ १७.२२ कोटी
- पांडुरंग श्रीपूर ६ कोटी
- अवताडे शुगर, मातोश्री लक्ष्मी शुगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे प्रत्येकी साडेपाच कोटी
- भैरवनाथ आलेगाव साडेचार कोटी
- विठ्ठल गुरसाळे तीन कोटी
- लोकमंगल भंडारकवठे अडीच कोटी
- धाराशिव सांगोला दीड कोटी
- भैरवनाथ लवंगी व भीमा टाकळी सिकंदर प्रत्येकी सव्वा कोटी रुपये थकवले आहेत.
अधिक वाचा: तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर