गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४९ हजार १६४ हेक्टरमधील पिकांचे नुकसान होऊन तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला.
यानंतर शासनाने महिनाभरापूर्वी यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला; पण यापैकी केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.
खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन कापणी आलेल्या धानपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले.
त्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ४९ हजार १६४ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान होऊन १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले, तर अतिवृष्टीने ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपयांच्या धानपिकांचे नुकसान झाले असून, ही नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली होती.
त्यानंतर शासनाने डिसेंबर महिन्यात नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा केली जात आहे.
मात्र महिन्याभराचा कालावधी लोटला तरी केवळ ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली असून तब्बल ८९ हजार १८८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्यापही जमा झाली नसल्याने शेतकरी बँका आणि कृषी विभागाच्या पायऱ्या झिजवीत आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शेतकरी
| तालुका | बाधित शेतकरी संख्या | रक्कम जमा झालेले | प्रतीक्षेत असलेले शेतकरी |
| गोंदिया | ५६७१८ | ०० | ५६७१८ |
| गोरेगाव | ८००३ | ०० | ८००३ |
| तिरोडा | २६०५२ | २५६२० | ४३२ |
| अर्जुनी मोरगाव | १३४१ | १३४१ | ०० |
| देवरी | ५५८२ | ३१०२ | २४८० |
| आमगाव | १७५८१ | १३५९३ | ३९८८ |
| सालेकसा | ११८५७ | ०० | ११८५७ |
| सडक अर्जुनी | ५७१० | ०० | ५७१० |
| एकूण | १३२८४४ | ४३६५६ | ८९१८८ |
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कायम
गेला रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसानभरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही; तर खरिपातील धानाचे ५८२ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या चार महिन्यांपासून थकले आहेत; तर धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही बोनस जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे चारही बाजूंनी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सावकार आणि नातेवाइकांच्या दारात उभे राहावे लागत आहे.
संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्यास विलंब
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जातात. त्यानंतर नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या बैंक खात्यावर जमा केली जात असल्याची माहिती आहे. मात्र सालेकसा, सड़क अर्जुनी, गोंदिया, गोरेगाव तहसील कार्यालयाने अद्यापही शेतकन्यांच्या याद्या अपलोड केल्या नसल्याची माहिती आहे.
रब्बीची नुकसानभरपाई केव्हा?
गेल्या वर्षी रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील धानपिकांचे नुकसान झाले होते. याचा चार हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता; पण कधी केवायसी संकेतस्थळ बंद असल्याचे कारण पुढे केले जात असून, दुसरा रब्बी हंगाम आला तरी शेतकन्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणार केव्हा, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
हेही वाचा : तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब
