अहिल्यानगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे.
यासाठी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार २६८ शेतरस्ते कामासाठी उपलब्ध असून, या प्रक्रियेत जास्तीत जास्त कंत्राटदार व यंत्रमालकांनी आपला सहभाग नोंदवून निविदा भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या स्वतंत्र योजनेचा मुख्य उद्देश शेत व पाणंद रस्त्यांचे बळकटीकरण करणे हा आहे. हे काम पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने व जलद गतीने करण्यासाठी सुलभकार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती व दहा विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने नुकतेच २२ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण सत्रही पार पडले.
जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ पर्यंत बंद असलेले, अतिक्रमित तसेच महसुली कायद्याप्रमाणे मोकळे केलेल्या रस्त्यांची संख्या २ हजार २६८ इतकी आहे.
ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्ते, शेत रस्ते किंवा पाणंद रस्ते अतिक्रमित असतील, त्यांनी ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधावा.
तसेच, अतिक्रमणमुक्त व सीमांकन झालेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन सदर प्रस्ताव तालुकास्तरावर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा: शेतजमिनींच्या पोटहिश्श्यांच्या मालकी हक्काबाबतचे वाद आता मिटणार; सुरु होतोय 'हा' पथदर्शी प्रकल्प
