पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या यवत (ता. दौंड) बैल बाजाराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक वर्षे बंद असलेला बैल बाजार पुन्हा सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साह आणि नवचैतन्य दिसून येत आहे. शुक्रवारी (दि. १६) अनेक जनावरांची विक्री झाली आणि लाखोंची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव काटे यांनी दिली.
व्यापारी आणि शेतकऱ्यांच्य मागणीनुसार बाजार समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी काष्टीसह इतर बाजारात जावे लागे, त्यात खर्चाचा त्रास आता थांबला आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील हा एकमेव बाजार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर कमी झाला असला तरी शेतकऱ्यांच्या दारात बैल जोड असणे हे मानाचे मानले जाते. त्यामुळे बैलांना पुन्हा एकदा मागणी वाढली असून, बाजारात गर्दी वाढत आहे. शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील खेड, बारामती, मावळ, भोर, पुरंदर, हवेली, शिरूर तालुक्यांसह बीड, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून तसेच काही गुजरातमधून व्यापारी बैल व एच.एफ. गाई खरेदीसाठी आले होते.
राजकीय नेत्यांनी तसेच तरुणांनी मतभेद विसरून एकत्र येऊन बाजार भरविण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी प्रयत्न केल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. बाजारामुळे यवत परिसरातील शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, सेवा पुरवठादार यांची उलाढाल वाढल्याने चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
यवत बैल बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी आर्थिक देवाण-घेवाण आणि खरेदीसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. या बैल बाजारासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येत आहेत. गावातील बैल बाजाराचे हरविलेले वैभव पुन्हा मिळवून देण्यात यवत ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. - समीर दोरगे, सरपंच, यवत.
