नंदुरबार जिल्ह्यातील बदलत्या हवामानामुळे मका पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा लक्षणीय वाढला आहे. अतिवृष्टीतही तग धरण्याची क्षमता, हिरवा व सकस चारा उपलब्ध होणे आणि लागवडीपासून काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाची सुविधा या कारणांमुळे मका शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
गेल्या काही वर्षात मक्याच्या हेक्टरी उत्पादन क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. सुधारित बियाणे, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात सातत्य राखणे शक्य होत असल्याचे जाणकार सांगतात. परिणामी, पारंपरिक ज्वारी व बाजरीच्या लागवडीत घट होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ज्वारी-बाजरीची लागवड कमी झाल्याने कडब्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. कडब्याचे दर वाढले असून शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. २५०० प्रति शेकडापर्यंत कडब्याचे दर पोहोचले आहेत. पशुपालकांना चाऱ्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे.
क्षेत्र घटले, ज्वारी-बाजरीला पक्ष्यांचा धोका
ज्वारी-बाजरीचे क्षेत्र घटत असताना पक्ष्यांचा वाढता उपद्रवही मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते.
रब्बीत ज्वारी-बाजरी ऐवजी मक्याला पसंती
रब्बी हंगामात शेतकरी ज्वारी-बाजरीऐवजी मका पिकाकडे वळत आहेत. अधिक उत्पादन, कमी जोखीम आणि यांत्रिकीकरणाच्या सोयीमुळे मक्याला प्राधान्य मिळत आहे.
वाहतूक खर्चही वाढला
इंधन दरवाढीमुळे चाऱ्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. बाहेरून कडबा आणताना प्रति ट्रिप अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.
ज्वारी-बाजरीच्या तुलनेने नाजूक; मळणी किचकट
ज्वारी-बाजरी पिके नाजूक असल्याने हवामानाचा फटका बसतो. कापणी व मळणी प्रक्रिया किचकट आणि खर्चीक असल्याने शेतकरी पर्याय शोधत आहेत.
मका मुरघासासाठीही विकता येतो
मका धान्यासह मुरघासासाठीही विक्रीयोग्य असल्याने दुहेरी फायदा होतो. पशुपालकांकडून मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध होते.
सध्या कडब्याचे दर वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी मका पिकाला प्राधान्य देत आहेत. मक्याची कुटी तयार करून विकण्यावर भर दिला जात आहे. - रामदास पाटील, शेतकरी.
