Millet Milk : मिलेट मिल्क घरगुती पद्धतीने तसेच व्यावसायिक प्रक्रिया पद्धतींनी तयार केले जाऊ शकते. ही प्रक्रिया भरड धान्यांपासून पोषणमूल्यांनी भरपूर आणि चविष्ट दूधासारखा द्रव तयार करण्यासाठी केली जाते. खाली टप्प्याटप्प्याने प्रक्रिया दिली आहे.
भरड धान्यांची निवड
मिलेट मिल्क तयार करताना योग्य प्रकारच्या मिलेट्सची निवड हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. चांगल्या प्रतिचे, परिपक्व आणि अशुद्धता विरहित धान्य वापरणे आवश्यक आहे. कारण यामुळे अंतिम उत्पादनाची गुणवत्ता, चव आणि पोषणमूल्ये निश्चित केली जातात.
बाजारात अनेक प्रकारचे मिलेट्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्रकाराचे पोषणमूल्य आणि चव वेगवेगळी असते. त्यामुळे, इच्छित पोषण घटक, चव व गुणवत्ता यावर आधारित योग्य मिलेट्सची निवड केली जाते.
स्वच्छता
मिलेट मिल्क तयार करण्यापूर्वी निवडलेली धान्ये नीट स्वच्छ करणे आवश्यक असते. या टप्प्यात धान्यांमधून माती, दगड, धूळ तसेच कोणतेही परकीय घटक (जसे की गवताचे तुकडे, प्लास्टिक, इतर धान्यांचे मिश्रण) काळजीपूर्वक वेगळे केले जातात. ही प्रक्रिया मुख्यतः हाताने किंवा यांत्रिक साफसफाई उपकरणांच्या सहाय्याने केली जाते.
स्वच्छतेच्या या टप्प्यामुळे दुधाच्या अंतिम स्वरूपात कोणतीही अशुद्धता राहत नाही आणि उत्पादनाची गुणवत्ता, चव व आरोग्यदृष्ट्या सुरक्षितता सुनिश्चित होते. त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण निर्मिती प्रक्रियेतील एक अत्यावश्यक आणि मूलभूत पायरी मानली जाते.
भिजवणे (Soaking)
स्वच्छ केलेली भरडधान्ये ६ ते ८ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवली जातात. यामुळे ती मऊ होतात, दळायला सोपी पडतात आणि एकसंध दूध तयार होते. भिजवल्यामुळे फायटिक अॅसिडसारखे अँटी-न्यूट्रिशनल घटक कमी होतात, ज्यामुळे खनिजांचे शोषण सुधारते. या प्रक्रियेमुळे पोषकद्रव्यांची जैव उपलब्धता व पचनास मदत करणारी संप्रेरके सक्रिय होतात. भिजवणे ही दुधाच्या चव, पोषणमूल्य व गुणवत्तेसाठी महत्त्वाची पायरी आहे.
दळणे (Grinding)
भिजवलेली मिलेट धान्ये १:३ किंवा १:४ प्रमाणात पाण्याच्या सहाय्याने ओल्या दळक्याने बारीक दळली जातात. ही प्रक्रिया दूध तयार होण्याचा मुख्य टप्पा असतो. दळल्यावर मिळणारे मिश्रण एकसंध, गुठळ्याविरहीत व पोषक घटकांनी भरलेले असते. दळणीनंतर प्रथिने, खनिजे व फायबर्स पाण्यात मिसळून पोषक द्रव तयार होतो. गुठळ्या टाळण्यासाठी एकसंध दळणे गरजेचे असते. चांगल्या मिलेट दूधासाठी दळणीची गुणवत्ता महत्त्वाची ठरते.
- श्रीमती काजल नवनाथ तांबवे, पी. हेमाशंकरी,
शास्त्रज्ञ, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन विभाग, भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान, राजेंद्रनगर (हैद्राबाद, तेलंगणा)