Summer Animal Care Tips: राज्यात सध्या तापमान झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मार्च महिन्यातच तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे जनावरांवर उष्णतेचा ताण वाढला आहे. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांच्या व्यवस्थापनात आवश्यक बदल करून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन विषय तज्ज्ञ डॉ. विनोद जानोतकर यांनी केले आहे.(Animal Care)
तापमान वाढल्याने जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.(Animal Care)
उष्णतेमुळे जनावरे कमी चारा खातात व जास्त वेळ सुस्त राहतात. परिणामी दूध उत्पादनात घट होत असल्याचे अनेक पशुपालकांचे अनुभव आहे.(Animal Care)
उष्णतेचा प्रजनन क्षमतेवर परिणाम
अत्याधिक उष्णतेमुळे जनावरांना उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याचा परिणाम प्रजनन प्रक्रियेवरही होतो. अनेकदा गर्भधारणा कमी होणे किंवा गर्भपात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उष्माघाताची लक्षणे
उन्हाळ्यात जनावरांमध्ये उष्माघाताची काही लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये शरीराचे तापमान वाढणे, हृदयाचे ठोके आणि श्वसनक्रिया वाढणे, डोळे लाल होणे, नाक कोरडे पडणे, भूक कमी होणे आणि सुस्ती येणे अशी लक्षणे आढळतात. अशा परिस्थितीत वेळेवर उपाययोजना न केल्यास दूध उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
चारा आणि पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक
उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा अधिक आणि कोरडा चारा कमी द्यावा. चारा दिवसातून तीन ते चार वेळा विभागून दिल्यास जनावरे अधिक चांगल्या प्रकारे खातात. तसेच जनावरांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
जनावरांना चरण्यासाठी पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर सोडावे, कारण या वेळेत तापमान तुलनेने कमी असते.
गोठ्यात हवा खेळती राहणे गरजेचे
उन्हाळ्यात गोठ्यात हवा खेळती राहील याची विशेष काळजी घ्यावी. जनावरांना झाडांच्या सावलीत किंवा थंड गोठ्यात ठेवावे. गोठ्याच्या छतावर गवत किंवा पन्हाटी टाकून त्यावर पाण्याचा फवारा मारल्यास उष्णतेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.
म्हशी आणि संकरित गायींना अधिक धोका
म्हशी आणि संकरित गायींना उष्णता सहन करणे अधिक कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या अंगावर दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारणे किंवा शक्य असल्यास पाण्यात बसण्याची व्यवस्था करावी. तसेच पिण्याच्या पाण्यात गूळ आणि मीठ मिसळल्यास जनावरे अधिक पाणी पितात आणि शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
पशुपालकांनी घ्यावी अतिरिक्त खबरदारी
विदर्भात उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्याने पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी आणि सावलीची व्यवस्था केल्यास उष्णतेचा परिणाम कमी करून जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवून ठेवणे शक्य होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
पशुपालकांनी काय कराव्यात उपाययोजना?
वाढत्या उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी 'या' उपाययोजना करणे आवश्यक आहे.
* सावलीची व्यवस्था करा
जनावरांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी झाडांच्या सावलीत किंवा हवेशीर गोठ्यात ठेवावे. गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
* मुबलक स्वच्छ पाणी द्या
उन्हाळ्यात जनावरांना दिवसातून अनेक वेळा स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्यात थोडे मीठ व गूळ मिसळल्यास जनावरे अधिक पाणी पितात.
* हिरवा चारा अधिक द्या
हिरवा चारा जास्त आणि कोरडा चारा कमी प्रमाणात द्यावा. चारा दिवसातून ३–४ वेळा विभागून दिल्यास जनावरे चांगल्या प्रकारे खातात.
* चराईची वेळ बदलावी
जनावरांना चरायला पहाटे ते सकाळी ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर सोडावे, कारण त्या वेळी तापमान तुलनेने कमी असते.
* शरीर थंड ठेवण्याची व्यवस्था
म्हशी व संकरित गायींवर दिवसातून २–३ वेळा पाण्याचा फवारा मारावा. शक्य असल्यास त्यांना पाण्यात डुबण्याची व्यवस्था करावी.
* गोठ्याचे तापमान कमी ठेवा
गोठ्याच्या छतावर गवत किंवा पऱ्हाटी टाकून त्यावर पाण्याचा फवारा मारल्यास गोठ्यातील तापमान कमी राहते.
* उष्माघाताची लक्षणे ओळखा
जनावरांचे शरीर तापमान वाढणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, भूक कमी होणे, सुस्ती येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा : Soil Health Card : माती सांगेल शेतीचे गणित; तपासणीमुळे उत्पादन वाढ, खर्च कमी
