जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर आणि कुची परिसरात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच जनावरांच्या चाऱ्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
त्यामुळे पशुपालक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. घाटमाथ्यावरील गावांमध्ये जनावरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
येथे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय केला जातो. उपलब्ध चाऱ्याच्या साठ्याचीही कमतरता भासत आहे. त्यातच चाऱ्याची वाढती मागणी यामुळे बाजारात जनावरांच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
सध्या उन्हाळा हंगामास प्रारंभ होत असून, या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढत आहेत. मका मुरघासाचा दर (प्रतिटन) सुमारे ६,००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
शाळू कडबा ३,२०० ते ३,३०० रुपये दराने विकला जात आहे. हायब्रीड वैरण २,५०० ते २,६०० रुपयांदरम्यान उपलब्ध असून, जोंधळा कडबा ३,३०० ते ३,५०० रुपयांपर्यंत गेला आहे.
ऊस सरीचा दर (लांबीनुसार) सरासरी ३,००० ते ३,५०० रु. असून, ऊस पेंडीचा दर (प्रति किलो) सरासरी ४ रु. आहे. इतर चाऱ्यांच्या तुलनेत मका आणि शाळूच्या मुरघास चाऱ्याची मागणी होत आहे.
चाऱ्याचे दर पुढीलप्रमाणे
◼️ मुरघास प्रतिटन - ६,००० रु.
◼️ शाळू कडबा शेकडा - ३,२०० रु.
◼️हायब्रीड कडबा शेकडा - २,५०० ते २,६०० रु.
◼️ जोंधळा कडबा शेकडा - ३,३०० ते ३,५०० रु.
◼️ ऊस प्रति सरी - ३,००० ते ३,५०० रु.
◼️ ऊस पेंडी प्रति किलो - ४ रु.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासत आहे. चाऱ्याचे दर तर अगदी गगनाला भिडले आहेत. याला पर्याय म्हणून मुरघास करून ठेवत आहोत. त्यामुळे पुढील संपूर्ण उन्हाळ्यावर कशीबशी मात करता येईल. - अमृत तातोबा शिंदे, पशुपालक शेतकरी
अधिक वाचा: उजनी धरणात आजमितीला किती पाणीसाठा? यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार का?
