उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 07:48 PM2024-01-11T19:48:53+5:302024-01-11T20:07:06+5:30

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतू उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण होत आहे.

मोदींच्याहस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रवाशांसाठी हा सेतू सुरू होणार आहे. त्यामुळे, मुंबईकरांची मोठी सोय होणार असून त्यांचा वेळ आणि इंधनही वाचणार आहे.

उद्घाटनपूर्व या सागरी सेतूचे संध्याकाळचे नयरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

समुद्राच्या सागरी पाण्यातू जाणारा हा मार्ग, मावळतीला लागलेला सूर्य, शांत समुद्र, गगनचुंबी इमारती आणि मुंबई नगरी, असं हे दृश्य नजरेत साठवून ठेवावं असं दिसून येतं.

मुंबईतील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू’ समुद्रात उभारणी करण्यात आलेल्या देशातील सर्वात जास्त लांबीचा (२२ किमी) पूल आहे.

दरम्यान, या सेतूवर प्रवाशी कारसाठी २५० रुपये टोल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत घेतला तर सागरी सेतूवर जे टोलनाके आहेत, तिथे ऑटोमॅटिक पद्धतीने टोल वसूल केला असणार आहे.

या सेतूवर बूम बॅरिअर नसणार असल्याची माहिती आहे. अशा प्रकारे टोल वसुलीसाठी बूम बॅरिअर नसलेला अटल सेतू देशातील पहिला रस्ता राहणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीस हा टोलनाका उभारण्याचे काम देण्यात आले होते.

प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या मार्गावरील पथकराचा दर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार असून या सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे.