राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे?; एकनाथ शिंदे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:29 PM2022-07-06T13:29:05+5:302022-07-06T19:58:07+5:30

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकत आपलं सरकार भक्कम असल्याचं दाखवलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्या व्हिपचं उल्लंघन करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

विधानसभेत बहुमत सिद्ध करताना आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकत आपलं सरकार भक्कम असल्याचं दाखवलं आहे. मात्र पाठीमागे १०६ आणि आणखी काही आमदारांचा पाठिंबा असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असल्याने या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं वर्चस्व राहणार की देवेंद्र फडणवीस याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संध्याकाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रश्नांना उत्तरं देत असताना अचानक फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील माईक खेचला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले. आता हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान, एकनाथ शिंदेंना संतोष बांगर हे कोणत्या पक्षातून तुमच्या पक्षात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाने एकनाथ शिंदे गोंधळले. काय उत्तर द्यावं हे त्यांना कळेना, कुठल्या पक्षामधून काय, ते शिवसेनेतून आलेत ना, असं ते म्हणाले.

तेवढ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरून माईक खेचला आणि सूत्रे आपपल्या हाती घेतली. संतोष बांगर हे शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेतून आले, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते, असं हजरजबाबी उत्तर फडणवीसांनी दिलं.

एकनाथ शिंदे यांना या सरकारचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असेल? तुमच्याकडे की देवेंद्र फडणवीसांकडे, असा प्रश्न विचारला. यावर मी आणि देवेंद्र फडणवीस अतिशय चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांचा पर्सनल अजेंडा काहीच नाही. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.