Join us  

खांदेश स्पेशल गुरमई रोटी; चव आणि पोषण दोन्हींसाठी ‘औषधी’ चविष्ट प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 8:35 PM

How To Make Gurmai Roti: हिवाळ्यात गोड तिखट पदार्थांची रेलचेल असते. चविष्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पोळ्या केल्या जातात. खान्देशात गुरमई रोटी करण्याला विशेष महत्त्व आहे.

ठळक मुद्देगुरमई रोटीचा मसाला एकदा करुन हवाबंद ठेवला की तो दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकतो.गुरमई मसाला करताना मसाल्याचं जिन्नस जेवढ्या प्रमाणात सांगितलं तेवढ्याच प्रमाणात घ्यावं. पोळीसाठी सारण करताना आपल्या आवडीनुसार मसाला घेतला तरी चालतो. पण हा मसाला प्रकृतीनं उष्ण असल्यानं थोडा जपून वापरावा.

How To Make Gurmai Roti:  हिवाळ्यात तिळाची, गुळ शेंगदाण्याची, सांज्याची पोळी केली जाते. खान्देशात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गुरमई रोटी अवश्य केली  जाते. ही पोळी केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी म्हणून केली जाते आणि  ती चवीनं खाल्ली जाते.  हिवाळ्यात ही गुरमई रोटी सकाळी नाश्त्याला खाल्ल्यास शरीराला आवश्यक ऊब मिळते,  दिवसभर ऊर्जा टिकून राहाते.

पावसाळ्यात ओलं होण्यानं होणारे त्रास टाळण्यासाठी खान्देशात ही गुरमई रोटी खाण्याची पध्दत आहे. बाळंतिण महिलेसाठीही ही गुरमई रोटी खूप पोषक आणि फायदेशीर ठरते. किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास एक गुरमई रोटी खाल्ल्यास कफ लवकर नियंत्रणात येतो. फक्त या गुरमई रोटीचा गुणधर्म उष्ण असल्याने गरोदर महिलेने आणि मुळव्याधीचा त्रास असलेल्यांनी ही गुरमई रोटी खाऊ नये. गुरमई रोटी  साजूक तुपासोबतच खायला हवी. 

Image: Google

गुरमई रोटी कशी कराल?

सर्वात आधी गुरमई रोटीचा मसाला करुन घ्यावा. हा मसाला एकदा करुन ठेवला तर तो तीन ते चार महिने चालतो. त्यामुळे हा मसाला हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच करुन ठेवावा. कारण ही रोटी पावसाळ्यात खाणंही तितकीच महत्त्वाची आहे.

यासाठी 15 ग्रॅम सूंठ पावडर, 5 ग्रॅम कोरांजनचे बारीक तुकडे ( आयुर्वेदिक दुकानांमध्ये गाठीच्या स्वरुपात मिळतं.) 5 ग्रॅम दालचिनी, जायफळ, 5 ग्रॅम  लेंडी पिंपळी, 5 ग्रॅम गाठी पिंपळी, 5 ग्रॅम पान पिंपळी, 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम काळीमिरी आणि 5 ग्रॅम वेलची घ्यावी. 

सर्वात आधी तव्यावर मसाले फक्त गरम करावेत. भाजू नये. फक्त यात जर काही आर्द्रता असेल तर ती निघून जाईल. मंद गॅसवर गरम तव्यावर हे मसाले हलके परतून घ्यावेत. गरम झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घालावे. जायफळचे तुकडे करुन घ्यावेत. तयार पावडर चाळणीने चाळून घ्यावी. मसाला बारीक हवा म्हणून तो चाळून घेणं गरजेचं. वाटलेला मसाला चाळताना त्यात सूंठ पावडरही चाळायला घालावी, म्हणजे तीही वाटलेल्या मसाल्यात व्यवस्थित एकजीव होते. चाळणीत उरणारा जाड भाग फेकून न देता थंडी पावसाळ्यात होणाऱ्या सर्दीवर काढा करताना त्यात वापरावा. 

Image: Google

गुरमई मसाल्यापासून पोळी तयार करताना..

सर्वात आधी कणिक मळून घ्यावी.  त्यासाठी दिड वाटी कणिक घ्यावी.  त्यात चिमूटभर मीठ घालावं. 1 चमचा साजूक तूप घालावं. तुपाने पोळी खुसखुशीत होते.  हे सर्व आधी नीट पिठात मिसळून घ्यावं. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक नेहमीच्या पोळीसाठी भिजवतो तशी भिजवावी. मऊसर मळली गेली की 15 मिनिटं तिला सेट होवू द्यावं. तोपर्यंत सारण तयार करावं.  

सारणासाठी अर्धी वाटी किसलेला गूळ घ्यावा. अर्धी वाटी गूळ घेतल्यास एक मोठा चमचा गुरमई रोटी मसाला घ्यावा.  या मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करता येतं. तीन भाग गूळ आणि एक भाग मसाला घेतला तरी चालतो. मसाला थोडा तीव्र असल्यानं तो जपून वापरावा.  त्यात एक चमचा साजूक तूप घालावं. तुपामुळे सारण छान मिळून येतं. हे सारण नीट छान मळून आणि मऊ करुन घ्यावं.  सारण मऊ झालं की सारणाचे पेढ्याच्या आकाराचे गोळे करावेत. कणिक पुन्हा छान मळून घ्यावी. कणकेचा एक छोटा गोळा घेऊन पुरणपोळी करताना जशी पारी खोलगट करतो तशी ती हाताने करुन त्यात गूळ मसाल्याच्या सारणाचा गोळा घालून तो नीट बंद करावा.  सारण पोळीत सर्वत्र पोहोचावं यासाठी हातावर बोटांनी हलक्या हातानं दाबत त्याची चाकी करुन घ्यावी.  सारण पोळी लाटताना सगळीकडे नीट पसरण्यासाठी गुळ मसाल्याचं सारण म्हणूनच मऊ असणं आवश्यक असतं.  

Image: Google

हातावर बोटांनी सारण भरलेली लाटी दाबून चाकी केली की ती पिठावर हलक्या हातानं लाटावी. लाटताना पोळीला पिठाचा हात लावावा.  पोळी भाजण्यासाठी तवा गरम करुन घ्यावा. त्यावर तूप घालून पोळी दोन्ही भाजून खरपूस भाजून घ्यावी.

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजना