पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, की बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावं. घराबाहेर पडू नये. पैसा पुरुष कमवेल बाईने फक्त चुलीपाशी थांबावं. तीच तिची खरी जागा. हळूहळू या विचारात बदल झाला. महिला फक्त संसार न सांभाळता, सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळायला लागल्या. त्या आर्थिकदृष्ट्याही त्या स्वतंत्र झाल्या. (Woman says she was denied a job because she is a mother, company thinks women can't do both)मात्र आजही महिलांबद्दलची विचारधारा पूर्ण बदललेली नाही. महिला उत्तम करिअर करु शकतात, हे पचवायला आजही अनेकांना जडच जातं. अगदी मल्टीनॅशनल कंपन्याही महिलांच्या बाबतीत भेदभाव करतात. अशी एक घटना एका उच्चशिक्षित महिलेनं नुकतीच शेअर केली आहे आणि तिचं म्हणणंच आहे की आपण आई असल्यानं कंपनीने आपल्याला नाकारलं.
IIM सारख्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या प्रज्ञा नावाच्या एका एक्सपर्टने तिचा अनुभव सोशल मिडियात शेअर केला. CMO (Chief Marketing Officer) च्या पोस्टसाठी तिने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली होती. तिच्याकडे ११ वर्षाचा मार्केटींगचा अनुभव आहे. आजवर उत्तम काम केल्याचे तिचे रेकॉर्ड आहे. पण त्या पोस्टसाठी तिची निवड झाली नाही. प्रज्ञा सांगते, माझी फक्त ११ मिनिटांची मुलाखत झाली. ज्यात ना अनुभव विचारला गेला ना कामाबद्दलचा एखादा प्रश्न. फक्त परिवाराबद्दल विचारण्यात आले. किती मुले आहेत? नवरा काय करतो? घरात किती माणसं आहेत? अगदी नवऱ्याचा कसला स्टार्टअप आहे हे ही विचारले मात्र माझ्या अनुभवाबद्दल एकही प्रश्न विचारला गेला नाही.
त्यानंतर तिनं पोस्ट लिहून आरोप केला की केवळ मी एक आई आहे, माझ्यावर माझ्या लेकराची जबाबदारी आहे म्हणून त्यांनी मला ते काम नाकारलं. प्रज्ञाने तिचा अनुभव सांगितल्यावर इतर महिलांनीही त्यांचे अनुभव सांगितले. मुलंबाळं असलेली महिला कामाला योग्य न्याय देऊ शकेल का, कारणं सांगत सुट्या घेईल का अशी भीती अनेकांना वाटते असं अनेकींनी सांगितलं. संसारी बाई, मुलंबाळं ही महिलांच्या अपात्रतेची कारणं आहेत का असा सवालही अनेकींनी केला.