उन्हाळ्यात कपड्यांना घामाचा वास येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेकदा हा वास घालवण्यासाठी आपण कपड्यांवर भरपूर डिटर्जंट पावडर वापरतो. पण जास्त पावडर वापरल्याने कपड्यांचे कापड हळूहळू कमकुवत होते, रंग फिका पडतो आणि काही वेळा कपडे फाटायलाही लागतात. (Don't use too much soap to remove the bad smell from clothes, instead use these natural things, the clothes will remain clean and soft.)त्यामुळे हा उपाय तात्पुरता वाटला तरी दीर्घकाळात तो कपड्यांसाठी हानिकारक ठरतो. त्याऐवजी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय वापरले तर कपडे स्वच्छ, ताजेतवाने आणि टिकाऊ राहू शकतात.
सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे घामट कपडे जास्त वेळ तसेच ठेवू नयेत. शक्यतो ते लगेच धुवावेत किंवा किमान पाण्यात भिजत ठेवावेत. कारण घाम सुकल्यावर त्यातील बॅक्टेरिया अधिक वाढतात आणि वास अधिक तीव्र होतो. कपडे धुण्यापूर्वी थोड्या कोमट पाण्यात मीठ घालून त्यात कपडे भिजवून ठेवले, तर घामाचा वास कमी होण्यास मदत होते. मीठ नैसर्गिकरीत्या बॅक्टेरिया कमी करते. त्याचप्रमाणे पाण्यात थोडा लिंबूरस घालून कपडे भिजवले, तर वास कमी होतो आणि कपडे अधिक स्वच्छ होतात.
बेकिंग सोडा हा आणखी एक प्रभावी उपाय आहे. कपडे धुताना थोडासा बेकिंग सोडा पाण्यात घातल्यास तो दुर्गंधी शोषून घेतो आणि कपडे मऊही राहतात. तसेच व्हिनेगर (सिरका) वापरणेही फायदेशीर ठरते. शेवटच्या पाण्यात थोडासा व्हिनेगर घातल्यास कपड्यांमधील उरलेला वास निघून जातो आणि कापड मऊ होते.
सूर्यप्रकाशात कपडे वाळवणे हा सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. सूर्यप्रकाशातील उष्णता आणि किरणे बॅक्टेरिया नष्ट करतात, त्यामुळे कपडे नैसर्गिकरीत्या स्वच्छ होतात आणि तसेच राहतात. शक्यतो कपडे पूर्णपणे वाळेपर्यंत बाहेरच ठेवावेत.
याशिवाय, कपाटात ठेवताना नीट वाळलेले कपडेच ठेवावेत. ओलसर कपडे ठेवल्यास पुन्हा वास येऊ शकतो. कधी कधी कपाटात सुगंधी गोळ्या तसेच सेंट वगैरे ठेवले तर वास चांगला येतो. त्यामुळे बंद कपाटातून येणारी दुर्गंधी
कमी करण्यासाठी मदत होते. थोडक्यात, जास्त पावडर वापरण्यापेक्षा नैसर्गिक आणि सौम्य उपाय वापरले, तर कपडे जास्त दिवस टिकतात आणि स्वच्छही राहतात. योग्य काळजी घेतल्यास कपडे केवळ स्वच्छच नाही, तर सुगंधी आणि मऊही राहतील.
