Join us

आम्हाला नातवंडाचं तोंड पहायचंय, घेऊन टाका चान्स! असं म्हणून घरातले बाळासाठी हट्ट करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 17:25 IST

family pressure to have a baby: why families want grandchildren: आपल्याला मूल हवं, केव्हा हवं याचा विचार करताना घरातल्यांचे हट्ट आणि दबाव यांचं काय करायचं?

ठळक मुद्देलग्नानंतर लवकरच एखादं मूल होऊ द्यावं असं घरातील जेष्ठ मंडळींचा दृष्टिकोन असतो. 'आधीच उशिरा लग्न झालंय, लवकर पाहिलं बाळ होऊन जाऊ द्या, नंतर वय वाढत जातं, पुन्हा प्रॉब्लम्स येऊ शकतात ' अशा अर्थाच्या सुचना जेष्ठांकडून मिळत असतात. 

डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)

जोडप्यांनाचं नाही तर त्यांच्या आई-वडील, सासू-सासरे यांना देखील पुर्वनियोजित गर्भधारणेच्या बाबतीत समुपदेशनाची गरज आहे. (family pressure to have a baby) गर्भ पत्नीच्या पोटात वाढणं हा निसर्ग नियम आहे पण त्यात पतीचा जैविक अंश आहे हे विसरून चालणार नाही, म्हणून महिलेची प्रकृती गर्भधारणेसाठी योग्य आहे किंवा नाही हे तपासत असताना पतीने देखील आपण ' बाप ' होणार आहोत, त्यासाठी आपल्या मनाची तयारी झाली आहे किंवा नाही हे आपल्या मनाला विचारूनच गर्भधारणेचा निर्णय घेतला पाहिजे.(why families want grandchildren) गर्भवती महिलेसाठी नवरा, सासू आणि कुटुंबातील अन्य सदस्यांकडून पाठबळ असल्यास त्याचा सकारत्मक परिणाम होत असतो याची जाणीव गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनात करून दिली जाते.(pressure to become parents)

खरंतर कुणाही महिलेनं स्वतःच्या मनाची तयारी झाल्याशिवाय ' चान्स ' घेऊ नये. बऱ्याचदा या बाबतीत स्त्रिया व्दिधा मनस्थितीत असतात. अशी मानसिक अवस्था जशी पहिल्या वेळेस असू शकते तशी एका अपत्यानंतर दुसरं कधी होऊ द्यावं या वेळेस पण असू शकते. नोकरी करणाऱ्या मुलींच्या मनात हा गोंधळ बऱ्यापैकी असतो. या बाबतीत तिच्या मनात जे असतं ते तिच्या पतीच्या, आईच्या किंवा सासूच्या मनात असेलच असं नाही. प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. लग्नानंतर लवकरच एखादं मूल होऊ द्यावं असं घरातील जेष्ठ मंडळींचा दृष्टिकोन असतो. 'आधीच उशिरा लग्न झालंय, लवकर पाहिलं बाळ होऊन जाऊ द्या, नंतर वय वाढत जातं, पुन्हा प्रॉब्लम्स येऊ शकतात ' अशा अर्थाच्या सुचना जेष्ठांकडून मिळत असतात. 

लग्नानंतरही आठवडाभर सिंगल! तरुण पिढीमध्ये वाढतोय नवा ट्रेण्ड, Weekend Marriage! संसार शनिवार-रविवार

कधी-कधी डॉक्टरांना गंमतीदार अनुभव येतात. नवदांपत्य ' आम्हाला आताच गर्भधारणा नको, नियोजन कसं करायचं ?' यावर चर्चा करण्यासाठी डॉक्टरांकडे येतात तेंव्हा त्यांच्या सोबत आलेली आई अथवा सासू, नवदांपत्यांच्या माघारी दबक्या आवाजात डॉक्टरांना सांगतात, 'त्यांना लवकर चान्स घ्या म्हणून सांगा, आम्हाला नातवाचं तोंड बघायची इच्छा आहे. तुम्ही सांगितलं तर ते ऐकतील, आमचं म्हणणं तर ते उडवूनच लावतात.'या सूचनांचा अनादर न करता, नवदांपत्याने जेष्ठ मंडळींना विश्वासात घेऊन अपत्यजन्माच्या बाबतीत जो काही निर्णय आपण घेतलेला आहे तो त्यांना समजावून सांगणं योग्य. गर्भधारणा लग्नानंतर लगेच राहू द्यायची का काही कालावधीनंतर हा सर्वस्वी निर्णय अर्थातच पती-पत्नीचा आहे. या बाबतीत पती-पत्नीमधील संवादाचा बऱ्याच सुशिक्षित जोडप्यांमध्ये देखील अभाव आढळतो. आपल्याला आता बाळ पाहिजे अशी मनाची आणि शरीराची तयारी झाल्यानंतर प्रसन्न चित्तानं गर्भ वाढवला पाहिजे. ' कधी नवऱ्यामुळे, कधी सासूबाईंचे 'आदेश', कधी आई-वडिलांची इच्छा या कारणांनी गर्भ वाढवला जातो. असं होत असतं हे काही वाचकांना खरं वाटणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. मोठया शहरातील, सुशिक्षित, दोघेही नोकरी करणारे पती-पत्नी आजकाल याबाबतीत सतर्क होत असताना दिसतात, पण हे प्रमाण अतिशय कमी आहे.

(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy)atnurkarkishore@gmail.comMob : 9823125637 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप