Join us

Relationship Tips: नवर्‍याला मुठीत नको, मिठीत ठेवा! सुखी संसारासाठी विसरु नका 'या' खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 17:47 IST

1 / 8
'तू म्हणशील तसं' हे बऱ्याचदा टीशर्ट वर छापून घेण्यापुरतं मर्यादित असतं. वास्तविक पाहता 'मेल इगो' अर्थात पुरुषी इगो आड येतो. सगळ्या पुरुषांमध्ये तो कमी जास्त प्रमाणात असतो. बायकांना ज्याप्रमाणे रुसणं, फुगणं आवडतं, तसं पुरुषांना आपलं म्हणणं खरं करण्यात धन्यता वाटते. नेमकी तिथेच ठिणगी पडते, दोघेही आपलीच बाजू लावून धरतात आणि वाद होतात. अशा वेळी 'मेल इगो' ला धक्का न लावता आपल्या मनासारखे कसे घडवून आणायचे यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
2 / 8
बऱ्याचदा बायका मुलांवर आगपाखड करता करता नवऱ्याच्याही अंगावर धावून जातात, चार चौघात त्याला बोलतात, ओरडतात किंवा आपली बाजू रेटून मांडतात. यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहत नाही. त्यामुळे सुरुवातीला मध्यम, संयत स्वरात बोलण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमच्याकडून चुकूनही नवऱ्याचा अपमान होणार नाही आणि राग नियंत्रणात राहील. त्याच्याकडून होणाऱ्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करा. उठता-बसता त्याच्या चुकांवर बोट ठेवून त्याचा पाणउतारा करू नका.
3 / 8
काही जणी गमतीच्या नादात नवऱ्याला वाटेल तसे बोलतात. मात्र, एका मर्यादेनंतर केलेली मस्करी पुरुषांना सहन होतेच असे नाही. नवरा समजूतदार असला, तरी चार चौघात त्याला चुका दाखवण्याऐवजी त्याची बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न करा आणि एकांतात असताना तो कुठे चुकला आणि ती चूक कशी सुधारता आली असती हे सांगा.
4 / 8
नवरा किती बेशिस्त आहे आणि आपण किती शिस्तबद्ध आहोत हे दाखवण्यात अनेक बायकांना आनंद मिळतो. मात्र जडण-घडण वेगळी असते, संस्कार वेगळे असतात, सवयी वेगळ्या असतात आणि स्वभावही वेगळा असतो. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील असे नाही. छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. त्यामुळे त्याच्याही स्वातंत्र्यावर गदा येत नाही. गोड बोलून काही सवयी लावता येतात, मात्र एका रात्रीत बदल घडेल ही अपेक्षा चुकीची ठरेल.
5 / 8
मुलांच्या मनात आई वडिलांचे स्वतंत्र स्थान असते. वाद-भांडणात एकमेकांचा अपमान केला जातो, रागाच्या भरात वाट्टेल ते बोलले जाते, आदळ-आपट केली जाते. या गोष्टींचा बालमनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या मनातील इमेजला धक्का बसतो. हे टाळण्यासाठी मुलांसमोर भांडायचे नाही हे ठरवून टाका. तसे केल्याने भांडण तात्पुरते थांबते आणि खरंच भांडणाची गरज होती का, याचा विचार करायला पुरेसा वेळ मिळतो.
6 / 8
बायकांच्या डोक्यात भूतकाळात घडलेल्या घटनांच्या बखरी असतात. कोण कधी कसे वागले होते हे त्या व्यवस्थित लक्षात ठेवता आणि भांडणाच्या वेळी शस्त्र म्हणून त्या घटनांचा वापर करतात. मात्र ही उजळणी संसाराला घातक ठरते. पुरुषांना जुन्या विषयावर नव्याने चर्चा करण्यात अजिबात रस नसतो. बायका ते विषय मनात घोळवत असतात. ते साठवून ठेवण्यापेक्षा, रोज रात्री टोचणारे अलंकार आपण काढून ठेवतो, तसा मनातला राग काढून द्यायला शिका.
7 / 8
मैत्रिणीच्या नवऱ्याशी आपण आपल्या नवऱ्याची तुलना करत बसलो तर ती न संपणारी असेल हे लक्षात घ्या. मैत्रिणीचा नवरा तिच्या स्वभावाला अनुकूल आहे, म्हणून तुमचा स्वभाव त्याच्याशी जुळेल असे नाही. दोष गुण प्रेत्यकामध्ये असतात. आपल्या जोडीदाराला त्याच्या दोष गुणांसकट स्वीकारले तरच संसार सुखाचा होईल.
8 / 8
'अहो' म्हटल्यानेच आदर देता येतो असे नाही. नात्यात एकेरी उल्लेख महत्त्वाचा की दुहेरी हे महत्त्वाचे नसून एकमेकांबद्दल आदर ठेवणे महत्त्वाचे असते. ज्याच्याबद्दल आपण आदर बाळगतो, त्याच्याशी आपण प्रेमाने वागवतो, रागावतो पण अपमानास्पद बोलत नाही. नवरा आणि बायको हे एका संसार रथाची दोन चाकं आहेत. एक जरी चाक कोलमडलं तरी संसार रथ चालू शकणार नाही. म्हणून विश्वास, आदर आणि प्रेमाने हे नाते बांधून ठेवा, जेणेकरून नवरा मुठीत नाही तर मिठीत राहणे आपणहून पसंत करेल.
टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिप