IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
Updated:October 6, 2025 16:29 IST2025-10-06T15:42:07+5:302025-10-06T16:29:04+5:30
IAS Govind Jaiswal : गोविंद जयस्वाल यांचे वडील नारायण हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत हो

वाराणसी येथे राहणारे आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. एकेकाळी लोक त्यांना रिक्षा चालव आणि बहिणींना इतरांच्या घरी भांडी घासायला पाठवण्याचा सल्ला द्यायचे. पण आता गोविंद यांनी आपल्या यशाने लोकांना चोख उत्तर दिलं आहे.
गोविंद जयस्वाल यांचे वडील नारायण हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत होते. गोविंद सातवीत असताना त्यांच्या आईच ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. गोविंदला तीन बहिणी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती.
एका मुलाखतीत गोविंद यांनी त्यांचा अनुभव सांगितला, लोक त्यांची आणि त्यांच्या घरच्या परिस्थितीची खिल्ली उडवायचे, टोमणे मारायचे. पण त्यांनी हे सर्व शांतपणे ऐकलं. आपलं शिक्षण पूर्ण करून ते स्वत:च्या पायावर उभे राहिले.
गोविंद यांच्या वडिलांनी देखील कधीही हार मानली नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले आणि त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. असंख्य अडचणी आल्या पण ते खचले नाहीत.
गोविंद ११ वर्षांचे असताना, ते त्यांच्या मित्राच्या घरी खेळण्यासाठी गेले. तिथे झालेल्या अपमानाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. मित्रासोबत खेळत असताना, त्यांच्या मित्राच्या वडिलांनी गोविंद यांना कुटुंबाबद्दल विचारलं.
गोविंद यांनी सांगितलं की, वडील रिक्षा चालवतात. हे कळताच, मित्राचे वडील ओरडले आणि त्यांना घराबाहेर काढलं. लहान असल्याने गोविंद यांना नेमकं काय झालं हे तेव्हा समजलंच नाही.
ओळखीच्या एका व्यक्तीने त्यांना जगातील या चुकीच्या पद्धती समजावून सांगितल्या आणि इशारा दिला की जर त्यांनी आपली परिस्थिती बदलली नाही तर आयुष्यभर इतरांकडून अशीच वागणूक मिळेल.
सेवेतील सर्वोच्च पदाबद्दल विचारलं असता, गोविंद यांना सांगण्यात आलं की आयएएस ही देशातील सर्वोच्च नोकरी आहे. वयाच्या ११ व्या वर्षी, गोविंद यांनी एक दिवस आयएएस अधिकारी होण्याचा निश्चय केला. पण हा प्रवास अडचणींनी भरलेला होता.
गोविंद यांच्या वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठवण्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकला होता. याच दरम्यान पायाला दुखापत झाल्याने वडिलांना गाडी चालवणं थांबवावं लागलं. पैसे वाचवण्यासाठी, गोविंद दिल्लीत ट्यूशन घ्यायचे.
वाराणसीतील सरकारी शाळेत आणि हरिश्चंद्र विद्यापीठात गणिताचं शिक्षण घेतलेल्या गोविंद जयस्वाल यांना माहित होतं की त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांना जास्त काळ यूपीएससीची तयारी करू देत नव्हती. म्हणून, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सर्वतोपरी प्रयत्न केले.
२००६ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत ४८ वा रँक मिळवला. आज गोविंद हे भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात ज्वॉइंट सेक्रेटरी म्हणून काम करतात. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.