आजारपणामुळे गळून गेलात? ४ फळं खा! भरपूर एनर्जी मिळेल- थकवा, अशक्तपणा जाईल
Updated:March 15, 2025 15:18 IST2025-03-15T15:11:29+5:302025-03-15T15:18:21+5:30

आजारपणातून पटकन बरं व्हायचं असेल किंवा आजारपणामुळे कमी झालेली एनर्जी लेव्हल चटकन वाढवायची असेल तर काही फळं तुम्ही खायलाच पाहिजेत. ती फळं नेमकी कोणती ते पाहुया...
याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी paediatric_bumps_and_bruises या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगतात की आजारी पडल्यानंतर आपण खूप कमी प्रमाणात अन्न घेतो. त्यामुळे शरीरातली पोटॅशियमची पातळी झपाट्याने कमी होते आणि एनर्जी लेव्हल खाली येते.
ताप किंवा कोणत्याही प्रकारचा व्हायरल त्रास होत असेल तर तुमच्या शरीरातल्या कॉर्टीसॉल हार्मोनची पातळी वाढते. यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढते. शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी शरीरातली पोटॅशियमची पातळी वाढवणं गरजेचं असतं.
जर तुम्हाला मळमळ, उलट्या, जुलाब असा त्रास होत असेल तर शरीरातून जे काही लिक्विड बाहेर जातात त्याच्यासोबत भरपूर पोटॅशियमही निघून जातं आणि खूप अशक्तपणा जाणवायला लागतो,
त्यामुळे आजारी व्यक्तीच्या अंगात भरपूर एनर्जी आणणे गरजेचे असते आणि त्यासाठी पोटॅशियमयुक्त फळ खाणे फायद्याचे ठरते असे डॉक्टर सांगतात.
पोटॅशियमचा सगळ्यात चांगला स्त्रोत म्हणजे केळी. म्हणूनच डॉक्टर सांगतात की आजारपणात आणि त्यानंतरही काही दिवस मुलांना केळी खायला द्या.
केळीमुळे सर्दी होते, कफ वाढतो हे एक मिथक आहे. वास्तविक पाहता केळी अंगातली ताकद वाढविण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात, असेही व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
याशिवाय मोसंबी आणि पपई या फळांमधूनही चांगल्या प्रमाणात पोटॅशियम मिळते.
आजारी व्यक्तीला बऱ्याचदा नारळ पाणी दिले जाते. हे अतिशय योग्य आहे. कारण नारळ पाण्यामधुनही चांगल्या प्रमाणात पोटॅशियम मिळते. त्यामुळे अंगातली एनर्जी वाढण्यास मदत होते.