वेळ वाचवण्याच्या नादात आरोग्याशी खेळ; चहा, भात, चपाती पुन्हा गरम करुन खाल्ल्यास काय होतं?
Updated:March 10, 2026 18:25 IST2026-03-10T18:11:18+5:302026-03-10T18:25:12+5:30
चहा, भात किंवा चपाती पुन्हा गरम केल्यावर तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया...

अन्न आपल्या शरीराला पोषण देतं, म्हणूनच आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आजच्या धावपळीच्या काळात लोकांची दिनचर्या आणि खाण्याच्या पद्धती इतक्या बिघडल्या आहेत की, बहुतेक आजार याच कारणामुळे होत आहेत.
आयुर्वेदानुसार, आपण नेहमी संतुलित आहार आणि ताजं, गरम अन्नच खाल्लं पाहिजे. परंतु अनेकदा वेळेच्या अभावामुळे एकदाच अन्न बनवलं जातं आणि नंतर ते पुन्हा गरम करून खाल्लं जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. चहा, भात किंवा चपाती पुन्हा गरम केल्यावर तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे जाणून घेऊया...
जेव्हा तुम्ही अन्न शिजवता, तेव्हा त्यातील पोषक घटक थोडे कमी होतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही ते अन्न पुन्हा गरम करता, तेव्हा उरलेली पोषक तत्वे देखील नष्ट होतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा योग्य फायदा मिळत नाही.
चहा पुन्हा गरम करून पिणं
भारतीयांच्या रोजच्या सवयींमध्ये चहा हा एक अविभाज्य भाग आहे. मग ती घरातली गप्पांची मैफल असो किंवा ऑफिसमधील थकवा आणि तणाव दूर करायचा असो, लोकांना एक कप चहा प्यायला आवडतो.
हाच चहा जेव्हा तुम्ही पुन्हा गरम करता, तेव्हा त्यातील 'अँटीऑक्सिडंट्स' तर संपतातच, शिवाय यामुळे ॲसिडिटी वाढू शकते. परिणामी, आंबट ढेकर येणं, छातीत जळजळ होणं अशा समस्या जाणवू शकतात.
चपाती पुन्हा गरम करणं
बहुतेक घरांमध्ये चपात्या पुन्हा गरम करून खाल्ल्या जातात. परंतु यामुळे चपाती कोरडी होते. कोरडी झालेली चपाती केवळ चावायला कठीण जात नाही, तर ती पचायलाही जड जाते. यामुळे पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
शक्यतो नेहमी ताजी चपाती खाण्याचा प्रयत्न करावा किंवा चपाती थोड्या वेळापूर्वीची असेल तर ती गरम न करता तशीच खाणं केव्हाही चांगलं.
भात पुन्हा गरम करणं
घरांमध्ये भात वारंवार गरम करून खाल्ला जातो किंवा उरलेल्या भाताचे विविध पदार्थ बनवले जातात. जेव्हा तुम्ही भात पुन्हा गरम करता, तेव्हा त्यातील पोषक तत्वे कमी होतात.
मुख्य म्हणजे भात कशा प्रकारे ठेवला जातो, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जर भात योग्य पद्धतीने ठेवला नाही, तर त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात, जे आरोग्यास घातक ठरू शकतात.
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी ही माहिती शेअर केली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणताही पदार्थ पुन्हा गरम करण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा. थोडा वेळ आणि ऊर्जा खर्च करून ताजं अन्न तयार करणं केव्हाही उत्तम. ताजं अन्न केवळ चविष्ट नसतं, तर ते पोषणानेही भरपूर असतं.