सकाळच्या उरलेल्या वरणापासून रात्री करा ५ चटपटीत पदार्थ, वरण वाया जाण्याचं टेन्शनच नाही
Updated:November 9, 2025 09:35 IST2025-11-09T09:30:54+5:302025-11-09T09:35:02+5:30

कधी कधी सकाळी केलेलं वरण किंवा आमटी खूप उरते. पुन्हा ते रात्री खाण्याची इच्छा होत नाही. म्हणूनच त्याच चवीचं वरण पुन्हा खाण्याऐवजी त्याचे वेगळ्या चवीचे काही खमंग पदार्थ करून खा.
त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे थालिपीठ. वरणामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ त्यात घाला. कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात घाला. त्याचं छान खमंग थालिपीठ लावा.
दुसरा पदार्थ म्हणजे धिरडं. उरलेल्या वरणामध्ये थोडा रवा आणि थोडं बेसन घालून अगदी सैलसर पिठ भिजवून घ्या. त्यात सिमला मिरची, कांदा, टोमॅटो अशा भाज्याही मिक्सरमधून बारीक करून घाला. त्याचे धिरडे अतिशय चवदार लागतात.
फोडणी न घातलेलं साधं वरण उरलं असेल तर त्यापासून हॉटेलमध्ये मिळते तसं दाल तडका किंवा दाल फ्राय करता येतं.
उरलेल्या वरणात डाळीचं पीठ घाला आणि कांदा, बटाट्याचे काप करून घाला. खमंग भजी तळता येतील.
उरलेल्या वरणात उकडलेला बटाटा, बेसन, बारीक चिरलेल्या भाज्या घातल्या तर त्याचे चवदार टिक्की करता येतील.