Join us  

घरी पाहुणे आले की वयात येणारी मुलं चिडतात, वैतागतात- असं का वागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 4:46 PM

मुलांना पाहुण्यांची काय ॲलर्जी असते, शहाणी मुलंही पाहुण्यांशी का तुसड्यसारखी वागतात?

ठळक मुद्देपाहूणे आले की टीना असं का वागते?

खूप दिवसांनी पुण्याची बहीण येणार म्हणून सुवर्णा खूप खुशीत होती. ऑफिसवरुन आल्यावर तिने घरातला पसारा पटापट आवरला. अर्चनाला काय आवडतं याचा विचार करुन तिने स्वयंपाकही आटोपला. मधूनमधून सुर्वर्णाच्या मुलीला- टीनाला सूचना देणं सुरुच होतं. हे कर, ते करु नको, जरा स्वत:ची खोली आवरुन घे.. पण टीना मात्र ढिम्म. आता करते, नंतर करते म्हणत जागची हालली नाही की खोलीच्या बाहेरही आली नाही. मावशी घरी आली तर साधा दरवाजा उघडण्याचा उत्साहही तिच्यात नव्हता. मावशीने चार वेळा हाक मारल्यावर टीना बाहेर आली.

(Image :google)

असं का वागतात मुलं?

तसा हा प्रश्न अनेक घरांत दिसतो. आईबाबांचे नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी आले की मुलं आतल्या खोलीत जाऊन बसणार. धड बोलणार नाही, काही विचारलं तर हो नाही. एरव्ही गुणी असणारी मुलं पाहूणे आले की अशी का वागतात?टीनाचं वागणंही अर्थातच तिच्या आईला, सुवर्णाला अजिबात आवडलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मावशी गेल्यावर सुवर्णा टीनावर चिडलीच. 'मोठी होतेय तर तुला काय शिंगं फुटले का गं? एक दिवस कोणी आपल्या घरी आलं तर नीट वागायला काय होतं तुला? मावशी विचारते काय? तू बोलते काय? एवढा काय बोलायचा कंटाळा तुला?' आईच्या या बोलण्याने टीना वैतागली.. 'आई तू माझ्या मागे कटकट करु नकोस.. मला जे वाटलं ते मी बोलले!'आई हताश झाली. पाहूणे आले की टीना असं का वागते तिला कळत नव्हतं.  टीनाच्या अशा वागण्यानं सुवर्णाला पाहुण्यांसमोर आपल्याला मान खाली घालावी लागते असं तिला वाटायचं.  टीनाच्या वागण्यानं संतापलेली सुर्वणा खरं तर टीना अशी का वागते या प्रश्नानं काळजीतही पडली होती. खरंच असं का वागत असेल टीना?

 

(Image : google)

टीनएजर मुलांच्या वर्तनाच्या अभ्यासक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख सांगतात..

१. घरोघरी वाढीला लागलेल्या टीना अशाच वागतात. २. त्या मुद्दाम असं वागत नाही. त्या वागण्यामागे त्यांच्या शरीर मनातले बदल कारणीभूत असतात. ३. घरी आलेल्या पाहुण्यांशी, जाब विचारणाऱ्या आईशी टीना उध्दटपणे वागते कारण टीनाचा मेंदू आता मोठा होतोय. आकाराने नाही तर विचाराने. ४. आपल्याला सगळं कळतं असा विचार हा मेंदू करतोय. टीनानं असा विचार करावा ही खरंतर निसर्गाचीच इच्छा आहे. 

५. मुलांनी हळूहळू मोठं व्हावं, स्वत:ची जबाबदारी घ्यावी आणि इतरांचीही घ्यायला तयार व्हावं यासाठी मुलांच्या विचारांमध्ये , भावनांमध्ये बदल होत असतात. त्यांची शारीरिक ताकद वाढते. ६. उंची, वजन, हाडं, स्नायू वाढतात मग भावना/फीलींग्ज तीव्र होतात. सगळ्यात शेवटी विचार ताकदीचे होतात. ७. नवव्या दहाव्या वर्षी सुरु झालेला हा प्रवास पंचविसाव्या वर्षाच्या आसपास पूर्ण होतो. टीनाच्या बाबतीत हा प्रवास सुरु असल्याने तिच्या मनात भावनांच्या, विचारांच्या उलथापालथ घडत आहेत. 

८. या अशा टप्प्यात मुलांना कोणी काही सांगितलेलं, विचारलेलं, बोललेलं आवडत नाही. असं झाल्यास ते मोठ्यांना अप्रिय वाटतील अशाच प्रतिक्रिया देतात.९.  पण मुलं हळूहळू समजूतदार होतात. त्यांना फक्त थोडा वेळ द्यायला हवा!

वाढीला लागलेल्या मुलांच्या जगात नेमकं काय घडतं? वाचा विशेष लेखhttps://urjaa.online/

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं