सकाळी उठल्यानंतर डोके जड वाटते, अंथरुणातून उठावेसे वाटत नाही... डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा चक्कर आल्यासारखे वाटते... हाता-पायांत कसलाच त्राण उरला नाही, असं वाटून पुन्हा पडून राहावेसे वाटते. जर आपल्यालाही रोज सकाळी असा अनुभव येत असेल, तर हे केवळ साध्या थकव्याचे लक्षण नाही. सध्याच्या धावपळीच्या युगात मानसिक आरोग्य (Mental Health) आणि शारीरिक ऊर्जा यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. आपण या लक्षणांकडे 'रात्री नीट झोप लागली नसेल' म्हणून दुर्लक्ष करतो, पण हे 'ब्रेन फॉग' (Brain Fog) आणि वाढत्या मानसिक तणावाचे गंभीर संकेत असू शकतात.
आपला मेंदू आणि पचनसंस्था एकमेकांशी 'गट-ब्रेन ॲक्सिस'द्वारे जोडलेले असतात. जेव्हा आपण चुकीचे अन्नपदार्थ खातो, तेव्हा शरीरात तणाव वाढवणारे 'कॉर्टिसोल' हार्मोन वाढते. यामुळे मेंदूच्या पेशींना सूज येते आणि आपल्याला मानसिक थकवा जाणवू लागतो. जर आपल्यालाही हात-पायात त्राण नसल्यासारखे वाटत असेल किंवा डोकं सतत जड राहत असेल, तर आपल्या ताटात असे काही पदार्थ आहेत जे आपल्या मेंदूला हळूहळू कमकुवत करत आहेत. हे पदार्थ कोणते पाहूया.
अनेकदा गोड खाण्याची इच्छा झाली की आपण साखर खातो. पण साखर खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते. ज्यामुळे आपल्याला तात्पुरते फ्रेश वाटते. पण काही वेळातच ही पातळी तितक्याच वेगाने खाली येते. यामुळेच सकाळी उठल्यावर डोकं जड होणे आणि चिडचिड वाढणे असे प्रकार घडतात.
बिस्किटे, व्हाईट ब्रेड किंवा पास्ता यांसारख्या मैद्याच्या पदार्थांमध्ये फायबर नसते. हे पदार्थ पचायला जड असतात आणि ते मेंदूला मिळणाऱ्या ऊर्जेचा प्रवाह कमी करतात. यामुळे शरीराला सतत सुस्ती जाणवते.
सकाळी उठल्यावर थकवा घालवण्यासाठी आपण चहा किंवा कॉफी पितो. पण अति कॅफीनमुळे शरीराची फाईट ऑर फ्लाईट सिस्टीम सतत सक्रिय राहते. यामुळे हृदय धडधडणे, अस्वस्थता वाढते. ज्यामुळे आपला मानसिक तणाव देखील वाढते.
रस्त्यावरील तळलेले पदार्थ किंवा पॅकेज्ड चिप्समध्ये ट्रान्स फॅट्स असतात. हे फॅट्स मेंदूच्या पेशींना होणारा रक्तपुरवठा विस्कळीत करतात, ज्यामुळे सकाळी उठल्यावर चक्कर येणे किंवा विचार करताना गोंधळ उडतो. या सगळ्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. डिहायड्रेशनमुळे मेंदू आकुंचन पावतो आणि मज्जासंस्थेवर ताण येतो. यामुळे हात-पाय जड होतात आणि अशक्तपणा जाणवतो. गोड खाल्ल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढते, पण तितक्याच लवकर ती खाली देखील येते. जेव्हा ही पातळी खाली येते, तेव्हा मेंदूला ऊर्जेची कमतरता भासते. यामुळेच गोड खाऊन काही वेळ झाल्यानंतर आपल्याला थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागते.
