Join us  

खूप एकेकटं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? खरंच बोलाता कुणाशी मनातलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 6:34 PM

माझ्याशी बोला, मी आहे असं आपण कुणाला किंवा कुणी आपल्याला कितीही सांगितलं तरी तसं मनातलं कुणी कुणाशी बोलतं का?

ठळक मुद्देअचानक कोणाच्याही घरी असे कसे आणीबाणीत जाता येईल, ह्या प्रश्नांची उत्तरे खरेच एखाद्याला अशीही मदत लागणार असेल, तर विशेष मिळत नाहीत.

प्राची पाठक

फोनमध्ये काहीही आले की वाचून, न वाचून फॉरवर्ड करायची सवय इतकी पटकन कशी लागली असेल आपल्याला? अलिकडे केलेल्या फॉरवर्ड्समध्ये एक होते. जे खूप फिरले. "तुम्हांला एकटे वाटत असेल, जीव द्यावासा वाटत असेल, तर एक कप कॉफी प्यायला माझ्याकडे या. माझे दार खुले आहे". साधारण अशा अर्थाचे ते फॉरवर्ड होते. ते शेअर करून / फॉरवर्ड करून खचलेल्या, आत्महत्या करायला प्रवृत्त होणाऱ्या, एकटं वाटणाऱ्या कोणालाही आपण किती छान दिलासा दिला, असे आभासी समाधान आपण ह्या कृतीतून मिळवले. आपण एरवी फार काही करू शकत नाही कोणासाठी, निदान फॉरवर्ड तर करावे, म्हणून देखील काहींनी ते फिरते ठेवले. सगळ्यांनी एकमेकांना सांगितले, "एक कप कॉफी प्यायला दार उघडे आहे". कोणी इतर करतात म्हणून स्वतः देखील फॉरवर्ड केले. कोणाला वाटले, ह्यातून जागृती होणार. ती अर्थातच काही प्रमाणात झालीच. पण जागृत होऊन प्रत्यक्ष कुठे जायचे असेल कोणाला, तर नक्की कोणत्या मित्राकडे, मैत्रिणीकडे जावे, ते त्यात नव्हते. कोण कुठे राहते, ते त्यात नव्हते. केवळ माझ्याकडे या, असे जेंव्हा सर्व जण सांगतात तेंव्हा त्यात स्पेसिफिक मदत अशी काहीच नसते. ही कृती केवळ फॉरवर्ड करणाऱ्याला समाधान, मी काहीतरी केले, एखादा संदेश वाहून नेला, अधिकाधिक लोकांना वाचता येईल असे बघितले, इतकीच मर्यादित राहते.

हा मेसेज फॉरवड करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कधी फार एकटे वाटले, तर नेमके कोणाकडे जावे कॉफी प्यायला, ह्याबद्दल तो नक्की गोंधळून जाणार. कोणाकडे केंव्हाही कसे जाता येईल, ह्या प्रश्नाचे त्यात उत्तर नव्हते. जाणे इतके सहज असेल का? आपल्या घराजवळ कोण असेल, किती प्रवास करून कोणाकडे जावे लागेल, त्यापेक्षा आपण आहोत तसेच ठीक होऊन जाऊ का? असा विचार प्रत्यक्ष कृती करतांना आधी समोर आला असता.

आपण अगदी तापाने फणफणत असू, तर घराजवळच्या, नेहमीच्या डॉक्टरकडे जायला देखील आज बघू, उद्या जाऊ असे करत काही वेळ का होईना, ते अंगावर काढतो. इथे तर ओळख ना पाळख सगळ्या व्यक्ती नुसत्या फॉरवर्ड करत सुटल्या आहेत, माझे दार खुले आहे. पण ते दार कुठे आहे, अचानक कोणाच्याही घरी असे कसे आणीबाणीत जाता येईल, ह्या प्रश्नांची उत्तरे खरेच एखाद्याला अशीही मदत लागणार असेल, तर विशेष मिळत नाहीत.

असं का होतं?

१. एकटं वाटणं, ही एक भावना आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाला मनात येत असते. कधी थेट एकटे नसाल. भरल्या घरात एकटे असाल. मित्र यादीत, फोनच्या लिस्टमध्ये शेकडो नावे सेव्ह आहेत आणि तरीही गरजेला कोणी नाही, असे होतेच. "मला पेन दे रे जरा", हे जितके सहज मागितले जाते, तसे "बस माझ्यासोबत थोडा, मला एकटे वाटते आहे", असे इतके सहज बोलले जात नाही.

२. आपल्या एकटेपणावर दुसऱ्याची मदत घेण्यात संकोच असतो. दुसरा आपल्यासाठी रिकामाच बसलेला नसतो. सतत मदत घेतली तर आपल्याला त्याची सवय होईल का, दुसरा आपल्याला काय म्हणेल, कंटाळेल का, असे प्रश्न सतावत असतात. आजूबाजूला माणसं खूप. पण बोलायला कोणी नाही, हे वाटणे अजूनच एकटे पाडते आपल्याला. "मला कोणी समजूनच घेत नाहीत", "माझ्याबाबत नेहमी गैरसमजच केले जातात", असे दोन, तीन, चार प्रसंगात घडले, तर आपण आतल्याआत कोलमडून पडतो.

३. जरा धीर एकवटून कोणाची सोबत शोधायला, चार शब्दं बोलायला जातो, तर आपल्याला समजून घेतले जात नाही, ही भावना घेऊन परततो. पुन्हा असे करणे नकोसे होऊन जाते अगदी. कोणाची मदत नको, आपण एकटेच बरे, हे ही मनावर बिंबवतो. ह्या सगळ्यातून आपण अजूनच एकटे पडतो.

(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य