प्राची पाठक
‘ए क्या बोलती तू, आती क्या खंडाला’,असे म्हणता येईल असे कोणीतरी आपल्या सोबत असावे, त्याच्यासोबत भटकायला जावे, असे वाटते नां?खंडाळा जाऊ देत, गेला बाजार "किसी डिस्को मैं जाये, किसी हॉटेल मैं खाये" निदान इतके तरी कुणासोबत जावे असे वाटतेच."चला फिरायला जाऊ" असे जेंव्हा जेंव्हा मनात येते, तेंव्हा तेंव्हा ते कुणाच्या तरी सोबत करायचे आहे, ग्रुपमध्ये करायचे आहे असेच आपले प्रोग्रामिंग होऊन गेलेले असते. डोक्यात कोरून ठेवले जसे! एकटीने सहजच उठून सिनेमा बघायला जावे, एखाद्या कार्यक्रमाला जावे, चित्र प्रदर्शन बघायला जावे, दोन दिवस फिरायला जावे, असे फारसे मनात येत नाही. कारण तसे करणे म्हणजे दिमाग का दहीं! एकटीच कुणी फिरतांना दिसली अजूनही अनेकांना आश्चर्य वाटते. कोणी आओ मिलो चले म्हणायला नसेल, तर पळून जावेसे वाटते अगदी. "पळून जाणे" ही एकच गोष्ट अगदी मनापासून एकटीने करू शकतो, असे वरचेवर आपल्याला वाटत असते.
आधीच आपण धडपडून करिअर वगैरेंच्या मागे लागलेलो असतो. एक रुटीन शोधत असतो. "स्टेबल व्हा आयुष्यात" चे तुणतुणे लोकांनी आपल्या कानी कपाळी लावलेले असते. अशा सगळ्यांत फिरायला कुठून वेळ काढणार? नुकतीच नोकरी वगैरे पकडलेली असते, तर सुट्टीचा प्रश्न येतो. फिरणे करू की सावकाश, रिटायर झाल्यावर इतके ते लांबते मग! मग उलटे बोलणारे लोक सापडतात. "तरुण असतांनाच फिरायला पाहिजे जगात कुठेही. स्वस्त आणि मस्त फिरून होतो. अंगात ऊर्जा असते". आपण हे वाक्य घोकतो आणि बाकीच्या रेट्यात परत विसरून जातो. दुसऱ्यांचे ट्रिपचे सेल्फी डोळे विस्फारून बघत बसा, इतकेच उरते मग आयुष्यात. फिरायला जायचे म्हणजे पैसे देखील खूप लागणार, असेही मनात येत असते. आता कुठे आपण शिकून नोकरीला लागत असतो, काहींचे शिक्षण सुरु असते. कुणाला घरात पैसे मागावे लागणार असतात. त्यात मौजमजेला किती पैसे कुणाकडे मागणार किंवा स्वतः खर्च करणार, ही मर्यादा असतेच. मग आपण परत स्वप्नंच बघायची. पाठीला लावलेली सॅक, त्यात पाण्याची बाटली, थोडा खाऊ, स्पोर्ट शूज पायांत, हातात कॅमेरा, डोक्यावर कॅप. सगळा लवाजमा फक्त एकेक करून जमा करून ठेवायचा. पैसे साचतील तेंव्हा जाऊ, वेळ मिळेल, ग्रुप जमेल तेंव्हा जाऊ. खयाली पुलाव जोरदार. मग कोणी भारीतले ऍप्स डाऊनलोड करते. त्यात कसे सगळे रस्ते दिसतात. पत्ता विचारायची गरजच नाही. काय काय सोयी, प्रौढीने सांगते आपल्याला. कसेबसे सॅकपासून सगळे जमले की आपले गाडे ऍप पाशी अडते मग. ते शिकायला हवे. जणू काही रस्ता चुकूच नाही, असा नियम आहे! कुणाला रस्ता विचारला, तर महा पाप होणार आहे. "शी, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांशी काय बोलायचे", असा काही नियम आहे का, असेही आपण स्वतःला विचारात नाही. अनोळखी लोकांपासून सावध राहा, असे किती सातत्याने आपण लहानपणापासून इतरांकडून ऐकत असतो. सगळे जणू आपल्यालाच लुटायला येणार आहेत, इतका सावधपणा काय कामाचा? कोणी बरोबर असलेले चांगले, हे डोक्यात घुसते, ते अशाच प्रकारांत.
(लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)