Join us  

हे खाऊ की ते खाऊ?  हे पाहू की ते पाहू? -तुमचं ‘असं’ भिरभिरं झालं आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2024 8:00 AM

सतत नवनव्या ट्रेण्ड गुगल करुन धरसोड करणाऱ्या अनेकांचं जगणं कधीच बदलत नाही, असं का?

ठळक मुद्देएका गोळीत जादूई परिवर्तन. तशी रेड पिल प्रत्यक्षात नसते, हे मात्र लोक विसरतात.

तुम्ही कुणाला काहीही सांगा, माहिती द्या, ते खातरजमा करुन पाहण्यासाठी आधी ती माहिती गुगल करुन पाहतील. असा इंटरनेट रिसर्च करण्याचा छंद अनेकांना असतो. काहीही माहिती मिळो, ताडून पहायचं असो, ते आधी गुगल करतात मग विश्वास ठेवतात. ज्यांचं वजन वाढलं आहे, ज्यांना ते कमी करायचं आहे, डाएट करायचं आहे त्यांचा इंटरनेट अभ्यास तर विचारुच नका. काय खायचं, कधी खायचं, किती खायचं हे सगळं इंटरनेटवर अभ्यास करुन ठरवतात.

पण एक धरुन ठेवत नाहीत कारण कशावरही भरवसा नाही. हे कर, कधी ते कर, कध भलतंच. कधी हे फॅड, कधी ते फॅड. उड्या मारत राहणं हा काही तंदुरुस्त होण्याचा मार्ग नाही. त्यानं ना आरोग्य उत्तम होतं ना, मॅराथॉन पळता येतं. मात्र तरी लोक ‘हमखास’ यशाचे फॉम्युले म्हणत एक आठवडा ग्लूटन फ्री, एक आठवडा केटो, कधी डेअरी, कधी ऋतूजा दिवेकर, कधी दीक्षित डाएट, कधी जनरल मोटर्स डाएट करतच राहतात. सतत बदलतात, नवीन गुगलतात.

मुळात चौरस भारतीय पोषक आहार उपलब्ध असताना असं उड्या मारत प्रयोग करण्याची काय गरज? खाऊन मस्त वाटलं पाहिजे, इट ॲण्ड फील वेल हे सूत्र हवं. ते आपल्या आजीला कळलं होतं, तिचा खाण्यापिण्याचा विचार जास्त खमका होता. पण नाही आता सगळ्यांना रेड पिल पाहिजे, एका गोळीत जादूई परिवर्तन. तशी रेड पिल प्रत्यक्षात नसते, हे मात्र लोक विसरतात.

जे ‘खाण्याबाबत’ तेच ‘जगण्याबाबत’ तोच स्वभाव, तीच वृत्ती. हे कर, ते सोड, ते धर, ते पकड. तिथंही क्वीक सोल्यूशन्सचा विचार करतात. मग सल्ला देणारे कुणीतरी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे असतात, ते काही ‘इन्व्हेस्टर’ नव्हेत. मात्र ते काहीबाही सल्ला देतात, पैसे दुप्पट होतील, जास्त रेट मिळेल, शेअर्समध्ये गुंतवा, ती स्कीम घ्या, आणि जास्त लाभाच्या हव्यासापोटी काहीही साधकबाधक विचार न करता स्वीकारतात.

मात्र जीम इन्स्ट्रक्टरचं प्रमाणपत्र पाहून जीम लावण्यापेक्षा, त्याची तब्येत पहा, जो स्वत: वजनदार, बेढब त्याचं वर्कआऊट फसलेलं आहे हा कॉमन सेन्स आहे. तोच गुंतवणूक करतानाही स्वीकारायला हवा. मात्र असे सल्ले दिले की लोक ऐकत नाहीत, त्यामुळे मग ना जगण्याचा दर्जा सुधारतो ना काही खास सातत्य जगण्यात येतात.

टॅग्स :आरोग्यमानसिक आरोग्य