Join us  

सतत थकवा आल्यासारखं वाटतंय? नवं काही सुचत नाही? करा 4 गोष्टी, मेंदू होईल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 12:09 PM

स्वत:ला रिफ्रेश ठेवायचे म्हणजे काय? रिफ्रेश ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याविषयी...

ठळक मुद्देनिसर्गाच्या सानिध्यात गेल्याने तुम्हाला नक्कीच रिफ्रेश वाटू शकते. ताणतणवापासून दूर राहण्यासाठी प्राणायाम, ओंकार यांचा अतिशय उत्तम उपयोग होऊ शकतो. 

रोज सकाळी उठायचं, घरातली कामं करायची, आपलं आवरायचं आणि ऑफीसला पोहोचायचं. ऑफीसमधून आलं की परत घरातली कामं, स्वयंपाक, साफसफाई की झोपायचं. परत सकाळी उठून हेच रुटीन. सतत तेच तेच करुन आपण पार कंटाळून जातो. मानसिक आणि शारीरिकरित्याही आपल्याला अनेकदा थकून जायला होतं. कधी कामाचा ताण तर कधी आणखी काही गोष्टींचा ताण घेऊन आपला मेंदूही नकळत मलूल होतो. असे झाले हे आपल्या कदाचित लक्षात येत नाही. सततच्या धावपळीतून कुठेतरी थांबायला हवे आणि काही काळ आवर्जून विश्रांती घ्यायला हवी. खूप जास्त काम आणि स्वत:साठी किंवा आरामासाठी कमी वेळ यामुळे हा थकवा वाढत जातो. पण आपल्याला सतत कंटाळा किंवा थकवा येत असेल तर स्वत:ला रिफ्रेश करायची वेळ आली आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. आता रिफ्रेश ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे? त्यासाठी नियमितपणे काही सोप्या गोष्टी केल्यास आपण स्वत:ला ताजेतवाने ठेवू शकू, पाहूयात या गोष्टी कोणत्या...

१. उत्तम झोप

आपण नियमितपणे ८ ते १० तास झोपलो तर आपले आरोग्य उत्तम राहते असे आपण म्हणतो. हे जरी खरे असले तरी किती तास झोपतो यापेक्षा जितका वेळ झोपतो ती झोप गाढ आणि ताजेतवाने करणारी असते का हे लक्षात घ्यायला हवे. सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटत असेल तरच आपली झोप पूर्ण झाली असे आपण म्हणायला हवे. यासाठी झोपायच्या आधी किमान अर्धा तास आपण स्क्रीनसमोर नसू याची काळजी घ्यायला हवी. 

२. स्वत:साठीचा वेळ 

जे व्यक्ती आत्मकेंद्री असतात त्यांना स्वत:चा वेळ अतिशय गरजेचा असतो. तुम्ही समाजप्रिय असाल तर तुम्हाला सतत लोकांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे असे केल्याने फ्रेश वाटू शकते. पण आत्मकेंद्री व्यक्तींना स्वत:चा स्वत:साठी वेळ लागतो. हा वेळ मिळाला तर ते लोक आतून खूश आणि फ्रेश राहू शकतात. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहायचे तर दिवसातील काही वेळ आवर्जून स्वत:ला द्या.

३. ताणतणावापासून दूर राहायचा प्रयत्न करा

सध्या आपली जीवनशैली इतकी वेगवान झाली आहे की ताण असणे अतिशय सामान्य आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त ताण असणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. म्हणून ताणतणवापासून दूर राहण्यासाठी प्राणायाम, ओंकार यांचा अतिशय उत्तम उपयोग होऊ शकतो. 

(Image : Google)

४. छंद जोपासा, फिरायला जा 

आपलं शिक्षण हे आपल्याला अर्थिक स्थिरतेसाठई आवश्यक असले तरी छंद हे आपल्याला आंतरीक समाधान देत असतात. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, रोजची कामे होत राहतील मात्र त्यासोबतच आपल्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी अवश्य वेळ काढा. इतकेच नाही तर रोजच्या रुटीनमधून वेळ काढून दोोन ते तीन महिन्यांनी फिरायला जा. निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने तुम्हाला नक्कीच रिफ्रेश वाटू शकते. 

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइलहेल्थ टिप्स