समुद्राच्या अथांग लाटांना आपल्या जिद्दीने नमवणं सोपं नसतं, पण जेव्हा इरादे पोलादी असतात तेव्हा इतिहास घडतो, असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांनी अदम्य साहसाचा परिचय दिला ज्यामुळे आज संपूर्ण देश त्यांना कडक सॅल्युट करत आहे. पृथ्वीला गवसणी घालणारा २५,००० नॉटिकल मैलांचा थरारक प्रवास आणि अंगावर शहारे आणणारी ती जिद्द... 'शौर्य चक्र' विजेत्या या दोन रणरागिणींची प्रेरणादायी शौर्यगाथा! (two women naval officers awarded Shaurya Chakra)
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सरंक्षण मंत्रालयाने शौर्य पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या सैनिक आणि अधिकाऱ्यांची यादी जाहिर करण्यात आली. या यादीत भारतीय नौदलातील दोन धाडसी महिला अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. भारतीय नौसेनेच्या वाटचालीत असाच एक अभिमानास्पद क्षण नोंदवला गेला आहे. देशाच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या नौसेनेत प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान केवळ पदकापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या अदम्य धैर्याचा, जिद्दीचा आणि देशासाठी झोकून देणाऱ्या वृत्तीचा साक्षीदार आहे.
या दोन्ही शूर महिला अधिकाऱ्यांनी एका छोट्या नौकेच्या आधारावर तब्बल २५००० नॉटिकल माईल्सचा कठीण सागरी प्रवास पूर्ण केला. त्यांनी पाण्याच्या मार्गाने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. हे ऐकायला जितकं थरारक वाटतं, प्रत्यक्षात तो प्रवास तितकाच कठोर होता. उंच लाटा, अनिश्चित हवामान, सतत बदलणाऱ्या वाऱ्याची दिशा आणि महिनोन्महिने एकाकीपणाशी सामना हे सगळं त्यांनी निर्धाराने झेललं.
या दोन्ही महिलांना राष्ट्रपतींनी भारतीय नौदलातील दोन धाडसी महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रुपा अलागिरीसामी यांना शांतता काळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार, शौर्य चक्र प्रदान करण्याची घोषणा केली.
शौर्य चक्र हा पुरस्कार त्यांच्या धाडसाचा गौरव तर आहेच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो बदलत्या भारताचं प्रतीक आहे. आज भारतीय नौसेनेत शौर्याचं रूप केवळ पुरुषप्रधान राहिलेलं नाही. देशाच्या कन्या आता सीमा रेषा ओलांडून समुद्रातही आपली क्षमता सिद्ध करत आहेत.
