Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ, चारशे वर्षांहून जुन्या पुस्तकांना डिजिटल रुप देणारी हायटेक जिद्दी गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:12 IST

जुनी पुस्तकं जिर्ण होतात, त्यातली माहितीही हरवते मात्र नव्या पेटंटच्या काळात डिजिटायझशनचे बळ ते सारं वाचवू शकतं.

ठळक मुद्देकेंद्रशासनाच्या हस्तलिखीतांच्या दस्तावेजांचे नोंदणीकरण मोहिमेत त्यांचे मोठे येागदान

संजय पाठक

जुन्या दुर्मिळ पोथ्या, पुस्तकं, त्यातली महत्त्वाची माहिती हे सारं काळाच्या पोटात गडप होणार की, आपण ते सारं वाचवणार? त्याचं उत्तर डिजिटायझेशनमध्ये शोधणाऱ्या नाशिकच्या अनिता जोशी. त्यांचं काम एकदमच वेगळ्या स्वरुपाचं आणि अत्यंत मोलाचंही आहे. तीर्थक्षेत्र नाशिकमधील पुरोहीत आणि तीर्थेापाध्यायांकडे हस्तलिखीत पोथ्यांची कमी नाही. अशाप्रकारचे पौराणिक हस्तलिखीत म्हणजे कर्मकाडांचा दस्तावेज असा समज होऊ शकतो. मात्र, त्यात शास्त्रग्रंथ देखील असून त्यातील संदर्भ हे बौध्दीक संपदेसाठी (पेटंट) भारताच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पांडु लीपी मिशन अंतर्गत नाशिक- त्र्यंबकेश्वर येेथील सुमारे ३० हजार हस्तलिखीत ग्रंथांची नेांदणी शासनाकडे करण्यात आली असून ३० लाख पानांचे खास डिजीटायलझेशन करण्यात आले आहे. त्यामुळे या दस्तावेजाच्या नोंदणीतून पेटंट चळवळीला मोठे बळ मिळणार आहे. भारतात तशी पोथ्यांची कमी नाही, मात्र त्याची अधिकृतरीत्या सरकार दरबारी नेांदणी करण्यासाठी खरी चालना मिळाली ती, हळदींच्या पेटंटवरून! ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघूनाथ माशेलकर यांनी हे पेटंट जाऊ दिले नाही मात्र, त्यानंतर आता भारतातील पुरातन ज्ञान जे हस्तलिखीतात आहे, त्याची मालकांच्या नावावर नोंदणी करण्याची गरज होती. त्यामुळे २००३ पासून या कामाला केंद्रशासनाने सुरूवात केली. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे काम करणाऱ्या भांडारकर इन्सीट्युटचचे नाशिकमध्ये काम पहाणाऱ्या अनिता जेाशी यांनी २००५ सर्वेअर तर २००७ मध्ये समन्वयक म्हणून या कार्याची सुरूवात केली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तालुक्यात हस्तलिखीत पेाथ्यांच्या भांडारात शास्त्रोक्त माहिती शेकडो वर्षांपासूनच्या काळातील असली तरी त्या संबंधीतांना विश्वासात घेऊन ही हस्तलिखीते मिळवणे सेापे नव्हते. मात्र, एकेक करीत अनिता यांनी ग्रंथ मिळवले आणि त्यांची नोंदणी पुण्याच्या भांडारकर इन्सीट्युट मार्फत केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांकडे केली आहे.  २०१९ मध्ये केंद्रशासनाच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने हस्तलिखीत पोथ्या खराब होऊ नये यासाठी त्याचे डिजीटायलझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकमध्ये असलेल्या हस्तलिखीत पेाथ्या, त्याचे लेखक आणि अन्य माहितीपूर्ण तपशील अनिता जोशी यांनी नोंदवला आणि जवळपास तीस हजार हस्तलिखीत ग्रंथांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आता या हस्तलिखीत पोथ्यांचे डिजीटालयझेशन करण्यात येत आहे. त्यासाठी युएसकेएस या कंपनीने खास प्रकारचे तीन स्कॅनर नाशिकमध्ये आणले आहेत. एकेका स्कॅनरची किंमत तब्बल ४५ लाख रूपये इतकी आहे. त्यामुळे दुर्मिळ हस्तलिखीतांचे जतन करणे सोपे होणार आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी हा वारसा जतन होणार आहे. इतकेच नव्हे तर भविष्यात अशी कधी पेटंटचा लढा देण्याची वेळ आलीच तर त्यासाठी देशाची सज्जता असणार आहे.

(Image : Google)

हवामान, आयुर्वेदाचे ग्रंथ...

पोथ्या म्हंटले की पौराणिक कथा आणि कर्मकाड असा एक समज असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन हा शास्त्रासंदर्भातील ग्रंथ आहेत. नाशिकमध्ये असलेल्या हवामान खात्यावरील ग्रंथात तर ढग तयार होण्यापासून कोणत्या प्रकारच्या ढगात किती बाष्प आणि पर्जन्याचे कण आहेत, इथपर्यंत माहिती आहे. आयुर्वेदातील धातु आणि झटपट उपचारासाठी केले जाणारे चाटण याची देखील माहिती आहे. ही हस्तलिखीते हँडमेड पेपरवरील आहेत. आणि तीळाच्या तेलाची किंवा बाजरीची कणसे कापून त्याच्या काजळीची तसेच बेहडाच्या शाई तसे बोरूने केलेले लिखाण आहे. नाशिकचे हवामान आणि तत्कालीन कागद शाई यामुळेच चारशे ते पाचशे वर्षे झाले तरी ग्रंथ टिकून आहेत, असे समन्वयक अनिता जोशी सांगतात.

वेगळी वाट धरणाऱ्या अनिता जोशी

नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयात शिकत असतानाच अनिता जोशी यांनी भांडारकर इन्स्टीट्युटच्या एका कार्यशाळेत सहभाग घेतला आणि त्यांना त्याची आवडनिर्माण झाली. २००५ मध्ये सर्वेअर २००७ मध्ये समन्वयक म्हणून त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या आधी ही कामे दामुअण्णा खांदवे आणि प्राचार्य भास्कर गिरीधारी करीत होते. अनिता यांनी मराठी विश्वकोषाासाठी नोंद लेख त्यांनी लिहीलाय, गोदावरी अष्टांगांचा सांस्कृतिक अभ्यास त्यांनी केला असून अनेक संशोध प्रकल्प पूर्ण केल्याने या विषयातील व्यासंगी आणि तज्ज्ञ म्हणून त्यांची अेाळख आहे. केंद्रशासनाच्या हस्तलिखीतांच्या दस्तावेजांचे नोंदणीकरण मोहिमेत त्यांचे मोठे येागदान असून त्यांना उत्कृष्ट संग्राहक, अविष्कार, उर्जा प्रतिष्ठान, नवदुर्गा असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :महिलाप्रेरणादायक गोष्टीडिजिटल