- डाॅ. ऋचा सुळे खोत
माधवी, वय ४२ वर्षे, शाळेत शिक्षिका आणि दोन मुलांची आई. ती सांगत होती, अचानक छातीत धडधड होते, श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर आल्यासारखे वाटते, म्हणून मग ती जवळच्या डाॅक्टरांकडे गेली. डाॅक्टरांनी तपासले. ब्लड प्रेशर मोजले, तो काय? १५०/१०० होते. डाॅक्टरांनी गोळ्या दिल्या आणि पुढच्या तपासण्यांसाठी कार्डिओलाॅजिस्टकडे (हृदयाच्या डाॅक्टर) पाठवले. त्या डाॅक्टरांकडे गेल्यावर डाॅक्टरांनी माधवीताईच्या हृदयाच्या सर्व तापसण्या केल्या. पण त्याचबरोबर काही प्रश्न विचारले, माधवीताई तुमची झोप चांगली होते का? सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटते का? सध्या शाळेचे पेपर घरी तपासायला आणले आहेत ते कधीपर्यंत परत द्यायचे आहेत? सासूबाईंचा दमा सध्या कंट्रोलमध्ये आहे का? घरातली सर्व कामं आवरून तुम्ही स्वत:च्या आवडीचे असे काय करता? माधवीताईंनी वेळ मारण्यापूरती उत्तरं डाॅक्टरांना दिली. पण घरी येताना त्या विचार करत होत्या की, या सर्व गोष्टी मला कार्डिओलाॅजिस्ट का विचारत असावेत? याचा माझ्या बीपीच्या त्रासाशी काय संबंध? आपण हाच विचार करू की, जर वाढलेलं बीपी हा एक शारीरिक आजार आहे तर माझ्या आयुष्यातल्या घडामोडींशी त्याचा काय संबंध आहे?पण शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं आहे की, शारीरिक आजारांची नाळ कुठेतरी मनाशी सुद्धा जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना आपण कसे सामोरे जातो याचादेखील आपल्या कळत नकळत शरीरावर परिणाम होत असतो. जगताना प्रत्येक जण आपापल्या परीने चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देत असतो. त्याला आपण आपली 'कोपिंग स्टाइल' म्हणजेच जमवून घेण्याची पद्धत असे म्हणू शकतो.
त्रास होऊ नये म्हणून काय करायचे?
१. डाॅक्टरांनी सांगितलेल्या पथ्यपाणी व गोळ्या औषधांबरोबर बीपी कंट्रोल करण्यासाठी ताणतणावाला योग्य पद्धतीने तोंड द्यायला शिकणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. २. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या नियंत्रणाखाली काय आहे आणि नियंत्रणाबाहेर काय आहे हे ओळखले पाहिजे. जसे की हवामान, वीज कधी येते, कधी जाते किंवा आपल्या भवतालचा, संपर्कातला माणूस कसा वागेल. काय बोलेल हे आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत. पण आज फार ऊन आहे तर सनकोट घालावा किंवा लाइट जातील, शनिवारचे जे आधीच विचार करून पाणी भरणे हे आपल्या नियंत्रणाखाली असणारे घटक आहेत. ३. वर्तमान क्षणात जगायला शिकायला हवे. यासाठी ध्यान, योग, प्राणायाम, खोल श्वासाचे व्यायाम याचा चांगला फायदा होतो. ४. त्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची भावनांची आणि शारीरिक संवेदनाची अधिक चांगली जाणीव होते. ५. आपल्याला त्रास न होऊ देता या संवेदनांचे नियोजन करणे अधिक सोपे जाते. याला 'माइंडफुलनेस' पद्धती असं म्हणतात. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायला त्याचा फायदा होतो.
(लेखिका मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)