Join us   

सतत सर्दी-सायनसचा त्रास होत असेल तर अजिबात करु नका ४ चुका, डॉक्टर सांगतात असं केल्याने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2023 12:09 PM

Avoid 4 Mistakes when you have cough and cold : सर्दी-कफ जास्त काळ टिकू नये आणि लवकर बरी व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स..

सर्दी किंवा सायनस ही अनेकांसाठी अतिशय साधी समस्या असते. याचे कारण म्हणजे काही जणांना हा त्रास सातत्याने होत असतो. थोडी हवा बदलली, धुळीत जाणे झाले, प्रदूषण, प्रतिकारशक्ती कमी असेल आणि सर्दी झालेल्या व्यक्तींशी संपर्क आला तर किंवा अतिरीक्त ताणामुळेही सर्दी होते. सायनसचा त्रास असेल तर तो लवकर बरा होणारा नसल्याने सर्दी डोकं, नाक, चेहऱ्याचा भाग यांच्यात साचून राहते. असे झाल्यास डोकेदुखी, अस्वस्थपणा, झोपेत श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या निर्माण होतात. यामुळे जेवणही नीट जात नाही आणि झोपही पूर्ण होत नाही (Avoid 4 Mistakes when you have cough and cold).  

सर्दीमुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरेसा  पुरवठा झाला नाही तर आपल्याला दिवसभर अजिबात फ्रेश वाटत नाही. अशावेळी एकतर औषधे घेऊन आपण ही सर्दी बरी करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर काही ना काही घरगुती उपाय करुन हा त्रास कमी कसा होईल ते पाहतो. पण अशावेळी आपल्याकडून काही चुका नकळत केल्या जातात. त्या कोणत्या आणि त्या केल्याने नेमके काय परीणाम होतात याविषयी आयुर्वेदीक डॉक्टर डिंपल जांगडा काय सांगतात पाहूया...   

१. औषधोपचार

सर्दी बरी करण्यासाठी औषधे घेतली जातात. पण जुन्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्दी दाबण्यासाठी औषधे घेणे योग्य नाही. यामुळे कफ शरीरात तसाच राहतो. त्यापेक्षा कफ बाहेर पडणे आणि निघून जाणे केव्हाही जास्त चांगले. नाक शिंकरणे, रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. 

२. वाफ न घेणे 

सर्दी किंवा कफ असेल तर वाफ घेतलेली चांगली असते हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही आपण वाफ घ्यायचा कंटाळा करतो. पण आपला कफ जर घट्ट असेल तर तो मोकळा होण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. गरम पाण्यात निलगिरी तेल किंवा पुदीन्याची पाने घालून त्याने वाफ घेतल्यास निश्चितच फायदा होतो.  दिवसातून २ ते ३ वेळा अशी वाफ घेतल्यास नैसर्गिकरित्या कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. 

३. व्यायाम करावा की नाही? 

सर्दी झालेली असताना आपल्या शरीराची ताकद कमी झालेली असते. अनेकदा सर्दीमुळे आपल्याला जेवण जात नाही आणि झोपही नीट होत नाही. अशावेळी आपण व्यायाम किंवा खूप दगदग केली तर शरीर आणखी थकते. तसेच घामावाटे शरीरातील क्षार बाहेर पडतात. यामुळे आपली सर्दी-कफ बरा व्हायला जास्त वेळ लागतो आणि या आजारातून लवकर बरे होण्यासही वेळ लागतो. 

४. गुळण्या न करणे 

वाफ घ्यायचा आपण ज्याप्रमाणे कंटाळा करतो त्याचप्रमाणे आपण गुळण्या करायचाही कंटाळा करतो. पण सर्दी ही नाक किंवा छातीत होत असली तरी त्याचे इन्फेक्शन हे आपल्या घशात असते. विषाणू आणि अॅलर्जी ही घशात असल्याने त्याठिकाणीच मुख्य इन्फेक्शन असते. ते कमी होण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि हळद घालून गुळण्या करायला हव्यात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग