Join us   

फळं-भाज्या अधिक खाणाऱ्या मुलांचं मानसिक स्वास्थ्य असतं उत्तम, रिसर्चचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 7:19 PM

मुलांनी फळं आणि भाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं, असं एक अभ्यास सांगतो आहे. 

ठळक मुद्दे फळ आणि भाज्या खाण्याचा आणि मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा काही संबंध असतो, हे सांगणारं हे पहिलंच संशोधन आहे, असं देखील या संस्थेतर्फे सांगण्यात आलं आहे.

फळं खाण्यासाठी मुलं आनंदाने तयार असतात. पण भाज्या किंवा सॅलड खायचं म्हंटलं की लगेच मुलं नाकं मुरडतात. मग या ना त्या कारणाने, लाडीगोडी लावून मुलांना फळ आणि भाज्या खाऊ घालताना त्यांच्या आईच्या अगदी नाकी नऊ येतात. पण पालकांनो, यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी घ्या. पण मुलांना फळ आणि भाज्या योग्य प्रमाणात खाण्याची आवड लावा. कारण नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की जी मुलं फळं आणि भाज्या योग्य प्रमाणात खातात, त्यांचं मानसिक आरोग्यही इतरांच्या तुलनेत अतिशय उत्तम असतं. 

 

UEA येथे याविषयी एक संशोधन करण्यात आलं आहे. University of East Anglia Health and Social Care Partners in collaboration with Norfolk County Council यांच्यावतीने हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून समोर आलेले संशोधन 'BMJ Nutrition Prevention and Health' या जर्नलमध्ये मांडण्यात आले आहे. फळ आणि भाज्या खाण्याचा आणि मुलांच्या मानसिक स्वास्थ्याचा काही संबंध असतो, हे सांगणारं हे पहिलंच संशोधन आहे, असं देखील या संस्थेतर्फे सांगण्यात आलं आहे.

 

या संशोधनामध्ये इंग्लंड येथील प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनातून समोर आलेला सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे जी मुलं फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खातात, ती मुलं मानसिक दृष्ट्या अतिशय सशक्त असतात आणि मानसिक तणाव हाताळण्याची त्यांची शक्ती उत्तम असते. 

 

आजकाल लहान मुलांवर तसेच किशोरवयीन मुलांवर अभ्यास, करिअर या गोष्टींचं प्रचंड प्रेशर असतं. त्यात सोशल मिडियामुळेही मुलांवरचा ताण अधिक वाढला आहे, असंही सांगितलं जातं. नैराश्याने घेरलेल्या तरूण मुलांचे प्रमाण तर सर्वच देशांमध्ये वाढत आहे. आयुष्यातल्या अडचणींना, संघर्षांना किंवा करिअरमधले चढ- उतार सांभाळताना मुलांनी शारीरिकदृष्ट्या खंबीर तर असलंच पाहिजे, पण त्याचं मानसिक आरोग्यही भक्कम पाहिजे. त्यामुळेच पालकांनो जागरूक व्हा आणि लहान वयापासूनच मुलांना फळं, भाज्या, सॅलड योग्य प्रमाणात खाऊ घाला, असं संशोधक सांगत आहेत. 

 

टॅग्स : आरोग्यपौष्टिक आहार