थंडीच्या दिवसांत बाजारांत मोठ्या प्रमाणात विकली जाणारी संत्री आपण आवडीने खातो. संत्री खाऊन आपण त्याच्या साली शक्यतो निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु या संत्र्याच्या साली आपल्या बागेतील रोपांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. संत्र्याच्या साली या रोपांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. आपण याच संत्र्याच्या सालींपासून घरातील रोपांसाठी अतिशय उपयुक्त असे बायो-एंजाइममध्ये लिक्विड खत सहज तयार करता येऊ शकते. संत्र्याच्या सालींपासून तयार केलेले 'बायो-एंजाइम' हे केवळ एक उत्तम नैसर्गिक खतच नाही, तर ते कीटकनाशक आणि उत्तम क्लिनर म्हणूनही काम करते(organic fertilizer from orange peels).
रोपांसाठी रासायनिक खतांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने रोपांची वाढ सुधारायची असेल, तर संत्र्याच्या सालींपासून तयार केलेले बायो-एंजाइम हा उत्तम पर्याय ठरतो. हे लिक्विड स्वरुपातील खत रोपांना आवश्यक पोषक घटक देते, मातीची गुणवत्ता सुधारते आणि कीडही दूर ठेवते. विशेष म्हणजे हे बायो-एंजाइम घरीच, अगदी कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने तयार करता येते. घरच्याघरीच, बाहेरून काहीही विकत न आणता संत्र्याच्या सालींपासून आपण (how to make orange peel bio enzyme at home) बायो-एंजाइम कसे तयार करायचे ते पाहूयात.
रोपांसाठी बायो-एंजाइम लिक्विड खत तयार करण्याची ट्रिक...
रोपांसाठी बायो-एंजाइम लिक्विड खत तयार करण्यासाठी आपल्याला एक मोठी रिकामी बाटली, ३०० ग्रॅम संत्र्याची सालं, १०० ग्रॅम गूळ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
बायो-एंजाइम तयार करण्याची सोपी कृती...
संत्र्याच्या सालींपासून बायो-एंजाइम बनवणे अत्यंत सोपे आहे. सर्वात आधी एक रिकामी प्लास्टिकची बाटली घ्या. त्यामध्ये संत्र्याच्या सालींचे छोटे तुकडे करून घाला. आता यामध्ये ठराविक प्रमाणात गूळ घाला. गूळ सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अन्नाचे काम करतो, ज्यामुळे आंबवण प्रक्रिया (Fermentation) वेगाने होते. बाटलीमध्ये पाणी भरताना ती पूर्ण काठोकाठ भरू नका. बाटलीमध्ये साधारण ८० % पाणी भरावे. बाटलीचा २० % भाग रिकामा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बायो-एंजाइम तयार होताना त्यातून गॅस बाहेर पडतो, त्यासाठी ही रिकामी जागा असणे गरजेचे आहे. सर्व साहित्य बाटलीत टाकल्यानंतर बाटलीचे झाकण घट्ट लावून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. सुरुवातीच्या १५ ते २० दिवसांत बाटलीचे झाकण दररोज उघडून त्यातील गॅस बाहेर काढायला विसरू नका, अन्यथा बाटलीवर दाब वाढू शकतो. साधारण २ ते ३ महिन्यांत तुमचे नैसर्गिक बायो-एंजाइम वापरासाठी तयार होईल.
बाटलीवर तयार करायला ठेवल्याची तारीख लिहा आणि ९० दिवसांसाठी (३ महिने) ती एका बाजूला ठेवून द्या. बाटलीमध्ये आंबवण प्रक्रिया सुरू असताना गॅस तयार होतो. त्यामुळे मधूनमधून बाटलीचे झाकण हळूवार उघडून गॅस बाहेर काढणे आवश्यक आहे. सुरुवातीला दर २ दिवसांनी, नंतर ४ दिवसांनी, ८ दिवसांनी आणि मग १६ दिवसांच्या अंतराने झाकण उघडून गॅस काढत राहा. जसा वेळ जाईल, तसा गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होईल. जर तुम्ही गॅस काढला नाही, तर बाटलीमध्ये प्रचंड दाब निर्माण होऊन बाटली फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे ही प्रक्रिया नियमितपणे करा.
जेव्हा ९० ते १२० दिवसांनी संत्र्याच्या सालींचा गर बाटलीच्या तळाला जाऊन बसेल, तेव्हा बायो-एंजाइम तयार झाले असे समजावे. हे मिश्रण दुहेरी थराच्या सुती कापडाने नीट गाळून घ्या. गाळून उरलेला जो घट्ट भाग आहे, तो फेकून देऊ नका. नवीन रोपासाठी 'पॉटिंग मिक्स' तयार करताना त्यात हा भाग मिसळल्यास मातीचा कस वाढतो. गाळलेले लिक्विड एका बाटलीत भरून ठेवा. साठवून ठेवल्यानंतरही सुरुवातीला थोडा गॅस तयार होऊ शकतो, त्यामुळे मधूनमधून झाकण उघडून गॅस काढण्याची काळजी घेत राहा.
रोपांसाठी असे घरगुती बायो-एंजाइम वापरण्याचे फायदे...
१. हे बायो-एंजाइम मातीला अधिक सुपीक आणि उपजाऊ करते, ज्यामुळे रोपांची वाढ नैसर्गिकरित्या आणि वेगाने होते.
२. संत्र्याच्या सालींमधील विशिष्ट वासामुळे मुंग्या, माश्या आणि बागेतील इतर हानिकारक कीटक रोपांपासून दूर राहतात.
३. या बायो-एंजाइममधून झाडांना आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक मिळतात, ज्यामुळे झाडांची पाने अधिक गडद हिरवीगार आणि टवटवीत दिसतात.
४. झाडांना होणारे विविध रोग आणि पानांवर पडणारी पांढरी बुरशी यांपासून संरक्षण करण्याचे काम हे द्रावण उत्तमरित्या करते.
