Gardening Tips: बरेच लोक आपल्या घराच्या बाल्कनीत, टेरेसवर वेगवेगळी झाडी लावतात. हे काम काही तसं अवघड नाही. पण झाडांची नियमित काळजी घेणं खूप गरजेचं असतं. बाहेरून झाडी विकत आणली, पाणी टाकलं आणि झालं असं करून झाडी टिकत नाहीत, फुलत नाहीत. झाडांना वेळेवर खत घातलं आणि योग्य प्रमाणात पाणी दिलं तर ती चांगली वाढतात आणि नेहमीच टवटवीत राहतात. बरेच लोक नेहमीच एक तक्रार करतात की, ते झाडांना नियमित पाणी घालतात, पण तरी सुद्धा झाडी मरतात, सुकतात. खरंतर झाडांची काळजी घेताना केल्या गेल्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे या गोष्टी होतात. अशात कोणत्या चुका करू नये हे आपण पाहणार आहोत.
झाडांना जास्त पाणी घालणं
अनेकदा काही लोकांना वाटतं की, झाडांना जास्त पाणी घातल्याने ते लवकर वाढतील. त्यांना फुलं येतील, पानं येतील. पण हा एक मोठा गैरसमज आहे. झाडांना फार जास्त प्रमाणात पाणी घालू नये. याने त्यांची वाढ खुंटते आणि ते मरतात. झाडाच्या मुळांना ऑक्सिजनची गरज असते. जर आपण झाडांना जास्त पाणी घालाल तर पाणी कुंडीत जमा होईल. यामुळे हवा खेळती राहणार नाही. याच कारणाने झाडी लवकर सुकतात. अशात झाडांना जास्त पाणी घालू नये. पाणी टाकण्याआधी मातीकडे लक्ष द्या. माती दोन ते तीन इंच आत कोरडी असेल तर झाडांना जास्त पाणी देऊ नये. तसेच कुंडीत खाली छिद्र करा. याने जास्तीचं पाणी निघून जाईल.
चुकीच्या ठिकाणी ठेवणे
झाडांचे प्रकार असतात. त्यामुळे सगळ्यांनाच एकसारखं ट्रिट करणं योग्य नाही. काही झाडांची वाढ उन्हात चांगली होते, तर काही झाडी सावलीत वाढता. त्यांना उन्हाची गरज नसते. बरेच लोक ही माहिती नसल्याने उलटं करतात. जसे की, सावलीत वाढणाऱ्या स्नेक प्लांटला लोक उन्हात ठेवतात. पण उन्हात त्याची पानं वाळतात आणि ते रोप मरतं. त्यामुळे कोणतं झाड कुठे ठेवावं याची माहिती घ्यावी.
खत न टाकणं
झाडांची वाढ चांगली होण्यासाठी त्यांना खत टाकणं खूप गरजेचं असतं. खतातून झाडांना आवश्यक पोषण मिळतं. पण रासायनिक खताने झाड मरू शकतं. अशात घरीच कचऱ्यातून भाज्यांमधून खत तयार करा. ते झाडांना टाका.
डाळ-तांदळाचं पाणी न देणे
जास्तीत जास्त घरांमध्ये स्वयपाक करताना डाळ किंवा तांदूळ धुतल्यानंतर ते पाणी फेकलं जातं. मुळात या पाण्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. त्यामुळे हे पाणी फेकण्याऐवजी झाडांना घाला. झाडांची चांगली वाढ होईल.
नियमित उखर न करणे
झाडांच्या चांगल्या वाढीसाठी जशी चांगली माती आवश्यक असते, तशीच मातीची उखर करणंही महत्वाचं असतं. झाडाच्या मूळांना ऑक्सिजन मिळावं म्हणून माती नियमितपणे उखरत राहणं गरजेचं असतं. विळा किंवा एखाद्या काठीने कुंडीतील माती सैल करा, याने झाडांना मोकळा श्वास घेण्यासही मदत मिळते.
