Join us

Gardening Tips: किचनमधले 'हे' तीन पदार्थ उन्हाळ्यातही तुमच्या रोपांना ठेवतील ताजे-टवटवीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:21 IST

Gardening Tips: टाकाऊतून टिकाऊ गोष्टी फक्त शाळेत नाही तर दैनंदिन आयुष्यातही वापरता आल्या पाहिजेत; पुढे दिलेल्या गार्डन टिप्स या उन्हाळ्यात नक्की कमी येतील. 

वाढत्या उन्हाळ्याचा त्रास आपल्याला सहन होत नाही, तर झाडं, वेली, रोपटी यांना किती होत असेल विचार करा... पशु पक्ष्यांसाठी आपण पाणी ठेवतो, त्याचप्रमाणे रोपांना सुद्धा उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी मिळाले तरच ती टवटवीत राहतील. कारण अति पाण्याचा मारा झाला तर रोपटे मरते. म्हणून कुंडीत ओलावा टिकून राहील असे घटक टाकणे उपयुक्त ठरते. त्यासाठी या लेखात घरातलेच काही उपयुक्त पदार्थ कसे वापरावे ते जाणून घेणार आहोत. 

आपल्या किचन गॅलरीमध्ये वा टेरेस गार्डनमध्ये असलेल्या रोपांची रोज देखभाल करणे आपल्याला शक्य होत नाही. आपण पाणी घालून मोकळे होतो. पण तेवढे पुरेसे नसते. झाडांच्या मुळांना पोषण मिळावे म्हणून पुढील घटक उपयुक्त ठरतील. 

कांद्याचे साल :

कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि इतर पोषक घटक असतात जे वनस्पतींसाठी फायदेशीर ठरतात. म्हणून, उन्हाळ्यात रोपं हिरवीगार ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या साली वापरू शकता. यासाठी तुम्हाला कांद्याची साले ४-५ तास पाण्यात ठेवावी लागतील. कांद्याचे गुणधर्म पाण्यात उतरतील. मग, तुम्ही ते पाणी झाडांमध्ये ओतू शकता. हे पाणी कीटक आणि रोगांपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यास देखील मदत करते.

केळीचे साल : 

केळं खाऊन झाल्यावर आपण साल लगेच फेकून देतो, पण केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक असतात, जे वनस्पतींसाठी लाभदायी असतात. उन्हाळ्यात, केळीच्या सालीचा वापर रोपाला उन्हाशी प्रतिकार करण्यासाठी होतो. यासाठी तुम्हाला प्रथम केळी सोलून सालं काढावी लागेल. ते साल सुकवावे लागेल. नंतर ते बारीक करून त्याची पावडर बनवा. यानंतर, ही पावडर मातीत मिसळा. ती वनस्पतींच्या वाढीस मदत करेल. एवढेच नाही वनस्पतीची वाढ छान होईल!

दालचिनी पावडर : 

दालचिनी पावडर रोपाची मुळे जलद मजबूत करण्यास मदत करते. एवढेच नाही तर ती, झाडांना कोमेजण्यापासून वाचवण्यासाठी देखील प्रभावी ठरते. उन्हाळा येताच जर तुमची बाग सुकू लागली तर तुम्ही मातीत दालचिनी पावडर घालू शकता. यासाठी तुम्हाला दालचिनीची छान पूड करून एक चमचा दालचिनी पावडर मातीत मिसळून रोपात घालायची आहे हे लक्षात ठेवा. 

तांदळाचे पाणी : 

उन्हाळ्याच्या हंगामात बागेतील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी आणि सुकलेल्या झाडांना पुन्हा हिरवे करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त एक मूठभर तांदूळ एक लिटर गरम पाण्यात भिजवायचे आहेत. हे पाणी पुन्हा गाळून घेत या द्रवात १ चमचा खाण्याचा सोडा आणि एक चमचा व्हिनेगर घाला. यानंतर, हे द्रावण रोपांच्या मातीवर ओता. त्यामुळेही रोपं ताजी टवटवीत दिसू लागतील. 

टॅग्स :बागकाम टिप्ससमर स्पेशल