बऱ्याचदा असं होतं की रोपांकडे पुरेसं लक्ष देऊनही कधी कधी त्यांची पानं पिवळी पडायला लागतात. कधी कधी पानांची टोकं कोरडी होऊन पानं गळायला लागतात, तर कधी कधी रोपांना अजिबातच फुलं येत नाहीत. शिवाय पानांचा रंगही चमकदार नसतो. रोपं टवटवीत दिसत नाहीत. अशी कोणतीही समस्या असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने रोपांना भरपूर पौष्टिक पदार्थ मिळतील, जेणेकरून रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.(how to make fertilizers for plants using onion?)
रोपांची चांगली वाढ होण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि तो बारीक चिरा. आता एका बादलीमध्ये २ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा घाला. त्यामध्येच १ वाटी शिजवलेला भात आणि २ ते ३ चमचे सोयाबीन घाला. यानंतर त्यामध्ये १ कप व्हिनेगर घालून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता हे मिश्रण झाकून २ ते ३ दिवस उन्हामध्ये ठेवून द्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात एक ते दिड लीटर साधं पाणी घालून ते रोपांवर शिंपडा तसेच कुंडीतल्या मातीतही घाला. सुरुवातीला काही दिवस १५ दिवसांतून एकदा आणि नंतर महिन्यातून एकदा हा उपाय करा. रोपांना कधीच कोणतं विकतचं खत घालण्याची गरज पडणार नाही.
हा उपायही करून पाहा..
कांद्याची टरफलंही रोपांसाठी खूप फायदेशीर ठरतात. हा उपाय करण्यासाठी कांद्याची टरफलं एका बादलीमध्ये घाला. ती टरफलं व्यवस्थित बुडतील एवढं पाणी त्यात टाका. यामध्ये तुम्ही केळीच्या सालांचे बारीक तुकडेही करून टाकू शकता. आता हे मिश्रण २ ते ३ दिवस तसंच राहू द्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि हे पाणी रोपांना द्या. रोपांमध्ये खूप छान बदल दिसून येईल. पानं हिरवीगार होतील आणि फुलझाडांना भरपूर फुलंही येतील.
