उन्हाळा म्हटलं की वाळवणाची लगबग आणि घराघरांत तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांची आठवण हमखास येते. या दिवसांत केलेले वाळवणाचे पदार्थ वर्षभर खाता येतात आणि त्यातही उपवासासाठी खास पदार्थ तयार करण्याचा आनंद आणि मजा काही वेगळीच असते. अशाच पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे भगरीपासून तयार केलेल्या कुरकुरीत चविष्ट चकल्या...उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, अशा वेळी तेलात तळलेली, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी भगरीची चकली असेल तर उपवासाची मजा द्विगुणित होते(Upvasachi Bhagar Chakli Recipe)
पापड, कुरडया आणि सांडग्यांसोबतच घरोघरी (Bhagar Chakli) उपवासाच्या भगरीच्या चकल्या देखील आवर्जून केल्याचं जातात...वर्षभर उपवासाला फराळ म्हणून खाता येणाऱ्या या चकल्या चवीला खुसखुशीत आणि दिसायला पांढऱ्याशुभ्र असतात. भगर आरोग्यासाठी हलकी असते आणि ती सहज पचते इतकंच नाही तर त्यापासून बनवलेल्या चकल्या चविष्ट तर असतातच, शिवाय त्या करायलाही अतिशय सोप्या आहेत. अनेकदा भगरीच्या चकल्या कडक होतात किंवा तेलात विरघळतात, पण योग्य प्रमाण आणि काही खास टिप्स वापरल्या तर त्या अगदी वेफर्ससारख्या हलक्या कुरकुरीत होतात. उपवासाच्या भगरीपासून परफेक्ट काट्याची आणि पांढरीशुभ्र (Varai Chakli Recipe) भगरीची चकली करण्याची पारंपरिक रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. वरई / भगर - १ किंवा १/२ किलो
२. जिरेपूड - १ टेबलस्पून
३. हिरव्या मिरचीची पेस्ट - २ ते ३ टेबलस्पून
४. मीठ - चवीनुसार
५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
६. पाणी - गरजेनुसार
विकतसारखी लालचुटुक, चमचमीत पावभाजी करण्यासाठी ७ टिप्स! पोटभर पावभाजी खाण्याचा लुटा मनमुराद आनंद...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात भगर घेऊन ती पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
२. आता एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवून त्याला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर या पाण्यात चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली भगर या उकळत्या पाण्यात घालावी.
३. चमच्याने हलवत भगर ३ ते ४ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावी. मग झाकण ठेवून ही भगर पूर्णपणे फुलवून घ्यावी.
४. भगर व्यवस्थित शिजल्यानंतर हे मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घ्यावं मग या मिश्रणात चवीनुसार मिरचीची पेस्ट, जिरेडपूड घालावी. सगळे मिश्रण कालवून कणिक मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यावं.
५. मळून घेतलेलं हे पीठ साच्यात भरुन त्याच्या गोलाकार चकल्या स्वच्छ, सुती कापडावर पाडून घ्याव्यात. ३ ते ४ दिवस नीट उन्हात या चकल्या संपूर्णपणे व्यवस्थित वाळवून घ्याव्यात.
वर्षभर तसेच विशेषत: उपवासाला खाण्यासाठीच्या कुरकुरीत, खुसखुशीत भगरीच्या चकल्या आपण नीट स्टोअर करून ठेवू शकता. तसेच गरजेनुसार गरम तेलात तळून कधीही खाऊ शकता.
