Join us

पदार्थात मीठ जास्त पडले? जेवण बेचव झाले, घाबरु नका, ५ टिप्स - जेवणाची चव सुधारेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2023 16:16 IST

Excess Salt in Food पदार्थात बहुतांश वेळा मिठाचे प्रमाण वाढते. त्यावेळी आपण संपूर्ण जेवण फेकून देतो. मात्र असं न करता काही आयडिया फॉलो करा..

पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी मसाल्यांसह मीठ खूप महत्वाची भूमिका बजावते. जेवणात मीठ नसेल तर त्या पदार्थाची चव बेचव होते. पदार्थात कितीही मसाले टाकले आणि मीठ नाही टाकले तर ते पदार्थ आपण खात नाही. मात्र, त्याच जागी जर अती मीठ पडले तर त्या पदार्थाची चव बिघडून जाते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण योग्य पडणे आवश्यक आहे.

एखाद्या खास प्रसंगी जर भाजीत जास्त मीठ पडले तर, आपला मुड बिघडतोच यासह संपूर्ण भाजी देखील फेकून द्यावी लागते. मात्र, असं न करता आपण काही युक्त्या लढवून त्या पदार्थाची चव सुधारू शकतो. भाजीतील अतिरिक्त मीठ सहजरीत्या कमी करू शकतो.

लिंबाचा रस

व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेला लिंबू जेवणातील चव तर वाढवतोच यासह जेवणातील अतिरिक्त मिठाचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करते. भाजीमध्ये मीठ जास्त पडले असेल तर लगेच त्यात लिंबाचा रस टाका. लिंबाच्या आंबटपणामुळे मिठाचे प्रमाण कमी होईल.

कणकेचा गोळा

डाळी किंवा भाजी शिजवताना त्यात जास्त मीठ पडले तर घाबरू नका. अशा स्थितीत आपण पिठाच्या गोळ्याचा वापर करू शकता. भाजीत मीठ पडले असेल तर, त्यात गव्हाच्या पिठाचा गोळा टाका. त्या भाजीत थोड्या वेळ शिजू द्या. भाजी किंवा डाळीत गव्हाच्या पिठाचे गोळे टाकल्यास अतिरिक्त मीठ शोषून घेते आणि मीठ पूर्वीपेक्षा खूपच कमी होते.

देशी तूप

भाज्या किंवा कडधान्यांमधील अतिरिक्त मीठ कमी करण्यासाठी देशी तूप खूप प्रभावी आहे. जेवणात मीठासोबत तिखटही जास्त लागत असेल तर, त्यात देशी तूप टाका. याने भाजीची चव खारट लागणार नाही.

दही

भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास घाबरुन जाऊ नका. दहीचा वापर करा. मीठ कमी करण्यासाठी भाजीमध्ये एक किंवा दोन चमचे दही घालून चांगले मिसळा. भाजीमध्ये दही घातल्याने मिठाचे प्रमाण संतुलित होते आणि चवही वाढते.

उकडलेले बटाटे

भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास उकडलेल्या बटाट्यांचा वापर करा. यासाठी भाजीमध्ये उकडलेले बटाटे टाका आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. बटाटे भाजीमध्ये असलेले अतिरिक्त मीठ शोषून घेते आणि मीठाचे प्रमाण संतुलित ठेवते.

टॅग्स :किचन टिप्सअन्न