Join us

ॲल्युमिनिअमची भांडी स्वयंपाकासाठी वापरणं धोक्याचं, रोज वापरत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 17:31 IST

ॲल्युमिनिअमची भांडी स्वस्त मिळतात म्हणून स्वयंपाकासाठी वापरली जात, पण रोजचा वापर घातक कारण..

ठळक मुद्दे या धातूच्या अति वापराचे दुष्परिणाम होऊ शकतात.

डॉ. राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)

स्वयंपाकघरात भांडी कोणती वापरावी यावर नेहमीच चर्चा होते. आता पुन्हा बिडाची भांडी, मातीची भांडी फिरुन आली आहेत. नॉन स्टिकचा वापर कमी करा अशी चर्चा सुरु झाली आहे. जुनी, पारंपरिक म्हणून वापरलेली ॲल्युमिनियमची भांडी आता मागे पडू लागली आहेत. स्टिल तर सगळेच वापरतात. पण मग पूर्वी ॲल्युमिनिअमची भांडी लोक वापरत आणि आताच ती वापरु नयेत असं म्हणतात त्याची कारणं काय असावीत?पूर्वी ॲल्यूमिनिअमचा वापर भरपूर केला जात असे. अजूनही इतर धातूंच्या मानानं ही भांडी स्वस्त मिळतात. आता रोजच्या वापरात नसली तरी अजूनही मोठमोठ्या कार्यात, समारंभात जेव्हा जास्त प्रमाणात स्वयंपाक करायचा असतो तेव्हा ॲल्युमिनिअम, हिंडालीयम या धातूंची भांडी, मोठी पातेली, कढई यांचा वापर केला जातो. कारण इतक्या मोठ्या मापाची इतर धातूंची भांडी प्रचंड महाग असतात आणी वजनाला खूप जड देखील ! अल्युमिनियमची पातेली मात्र हलकी असतात. त्यामुळे त्यांचा वापर सोयीचा होतो.

(Image : Google)

ॲल्युमिनियम वापरणं सुरक्षित आहे का?

१. निसर्गात अल्युमिनियम मोठ्या प्रमाणात सापडतं. तसेच ते नैसर्गिकरित्या अनेक पदार्थांमधून आपल्या शरीरात जातंही. पण त्याची अधिक मात्रा  त्रासदायक ठरू शकते.या भांड्यांमध्ये पदार्थ शिजवला आणि बराच वेळ त्यातच राहू दिला तर त्या पदार्थात ॲल्युमिनिअम उतरण्याची शक्यता अधिक असते.२. हल्ली ॲल्युमिनियमच्या भांड्यांशिवाय बेकिंग ट्रे, फॉईल्स अशा स्वरुपातही ॲल्युमिनिअम वापरलं जातं. जास्त उष्णता दिली गेली तरी ते ॲल्युमिनिअमच्या बाबतीत हितकर नाही. बरेचदा काही भाज्या किंवा पदार्थ बनवण्यापूर्वी शिजवण्यासाठी या फॉईल्स मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. भाज्या फॉईल मध्ये गुंडाळून मायक्रोव्हेव किंवा ओव्हनमध्ये ठेवले जातात आणि जास्त तापमानावर शिजवले जातात . ही गोष्ट घातक आहे. कारण फॉईलमधील ॲल्युमिनिअम अन्नात उतरु शकतं. त्यामुळे ग्रील करण्यासाठी फॉइल वापरु नये. अगदी एरवीही गरम पोळ्या, पराठे, ग्रील्ड सँडविच गुंडाळून फॉईलमध्ये रॅप केलं जातं . पण हे पदार्थ देखील अगदी गरम असताना लगेच गुंडाळू नयेत.३. जास्त मीठ,मसाले लावलेले पदार्थ, मॅरीनेट केलेले दही,लिंबू यांच्यासारख्या आंबट पदार्थांचा वापर करून बनवलेले पदार्थ ,टोमॅटो वगैरे फॉईलमध्ये ठेवून शिजवू नये.४. ॲल्युमिनिअमची भांडी,फॉइल्स हे क्वचित प्रसंगी आणि थोड्या वेळासाठी वापरले तर त्याचे लगेच दुष्परिणाम होत नाहीत परंतु कायमच या भांड्यांमध्ये अन्न शिजवून त्याचं प्रदीर्घ काळ सेवन होत असेल तर मात्न ते मेंदूसाठी अहितकर आहे. विसराळूपणा, चुकीच्या गोष्टी किंवा संदर्भ एकमेकात मिसळणं आणि गोंधळून जाणं, मेंदूची नेहमीची काम करण्याची क्षमता कमी होणं इथपासून तर प्रत्यक्ष मेंदूच्या पेशी मृतवत होणं किंवा थिजल्याप्रमाणो होऊन अल्झायमर हा आजार होईपर्यंत या धातूच्या अति वापराचे दुष्परिणाम होऊ शकतात.त्यामुळे ही भांडी न वापरलेली बरी !

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.) 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.