Join us

शिळी भगर खाणे धोक्याचे, उपवासाला भगर खात असाल तर लक्षात ठेवा ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 17:10 IST

नवरात्रात अनेकजण उपवासाला भगर खातात मात्र पचायला हलकी समजून सतत भगर खाणेही योग्य नव्हे.

नवरात्राचे उपवास सुरु आहेत. अनेकजण उपवासाला हमखास भगर खातात. भगर, काही ठिकाणी वरीचे तांदूळ असेही म्हणतात. ही भगर करायला सोपी, पचायला हलकी. चविष्टही. त्यामुळे भगर खाणे उपवासाला सोयीचे वाटते. सोबत ताकदही असले की पोटभर खाणे होते. मात्र नवरात्रीत शिळी, सकाळी केलेली भगर रात्री किंवा रात्री केलेली भगर सकाळी खाऊ नका असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाने केले आहे.याकाळात भगर-साबुदाणा या उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. त्याचकाळात भेसळयुक्त भगरही बाजारात येऊ शकते. त्यामुळे हे जिन्नस खरेदी करतानाही जागरुक असायला हवं. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सुटी भगर विकत न घेता, पॅकिंग पाहून, त्यावर वापराची मूदत पाहून मगच भगर खरेती करावी. बिलही घ्यावी.

(Image : Google)

भगर खरंच पचायला हलकी असते का?

अनेकांना असे वाटते की भगर पचायला हलकी असते. पण तसे नाही.भगर शिजवताना तुमच्या लक्षात येईल की तिला शिजायला खूप पाणी लागते. सैलसर आसट करायची तर दसपट पाणी घालून शिजवावे लागते. नाहीतर उपम्यासारखी करायची तर पाचपट. भगर स्वभावत: कोरडी असते. त्यात आपण दाण्याचे कूट घालतो. भाजूनही घेतो. पण तरीपण त्यात स्निग्धता कमी असल्याने भरपूर तूप घालूनच भगर खावी. चांगली भाजून, भरपूर पाणी घालून,  वाफेवर सावकाश शिजवावी.भगर आमटी खाऊनही पित्त होवूच शकते. त्यामुळे आमसूल नक्की वापरावे.शिळी भगर अजिबात खाऊ नये त्यानं अपचनाचा त्रास होण्याचा धोका आहे.

 

टॅग्स :अन्नपाककृती