भारतात जेवढे विविध खाद्यपदार्थ आहेत तेवढेच मंचिंग फूड्सही आहेत. ज्याला आपण टाईमपास म्हणतो किंवा मग चघळायला काही तरी हवे असते म्हणून सुका नाश्ता असेही म्हणतो. भरपूर असे पदार्थ असतात जे आहाराचा भाग नाहीत फक्त असेच खाल्ले जातात. (Does kurkure really contain plastic? See what FSSAI said, if you like kurkure, then definitely read it)पाश्चात्य स्नॅक्सचे पदार्थ आजकाल तरुण पिढी फारच आवडीने खाते. मात्र एकेकाळी टाईमपाससाठी केळा वेफर्स, बटाटा वेफर्स, कुरकुरे, चिप्स हे असे पदार्थ खाल्ले जायचे. त्यामध्ये कुरकुरे हा प्रकार तर फारच लोकप्रिय होता. आजही आहेच. स्वस्तात मस्त असा प्रकार असल्याने लोकं बिनधास्त खातात. ५ रुपये, १० रुपये एवढ्या किंमतीत चटपटीत कुरकुरे मिळतात. त्यामुळे लहान मुलेच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोक आवडीने कुरकुरे खातात.
काही वर्षांपूर्वी मात्र अचानक कुरकुरे खाण्याचे प्रमाण लोकांनी कमी करुन टाकले. लहान मुलांनी रडून हट्ट केला तरी आई त्यांना कुरकुरे अजिबात विकत घेऊन देत नसे. याचे कारण म्हणजे कुरकुऱ्यांबद्दल पसरलेली बातमी. कुरकुरे तयार करताना त्यात प्लास्टिक घातले जाते. त्याच्या आतील भाग जो पांढर्या स्फटिकासारखा दिसतो तो प्लास्टिकचाच असतो याची लोकांना अगदी खात्री पटली होती. गॅसवर कुरकुरे जाळून पाहायचे ते अगदी प्लास्टिक जळल्यासारखेच दिसते अशी चर्चाही भारतभरात सुरु होती. लोकांना हा प्रयोग करुन पाहीला होता. तुम्हीही केले असेल.
पण कुरकुऱ्यात खरंच प्लास्टिक असते का? असते तर मग ते सरकार मान्य कसे झाले असे अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांच निरसन करत एफएसएसएआय(FSSAI) ने स्पष्टीकरण दिले होते. कुरकुरेमध्ये प्लास्टिकच्या प्रमाणाबद्दलच्या अफवा खोट्या आहेत आणि कुरकुरे तांदूळ, मका आणि हरभरा या पदार्थांपासून केले जातात असेही सांगितले. जाळल्यावर धूर का येतो या प्रश्नाचेही उत्तर देत FSSAI ने सांगितले की, उष्णतेच्या संपर्कात आल्यावर वितळताना दिसणारा पदार्थ प्लास्टिक नसून अन्नातील स्टार्च आहे. स्टार्च आणि तेल एकत्र असताना जर उष्णतेच्या संपर्कात आले तर ते जळताना आणि वितळताना प्लास्टिकसारखेच दिसते.
कुरकुरे तळलेले असतात. तेलकट असतात आणि मसालेदार असतात, त्यामुळे हे आरोग्यासाठी चांगले ठरतात किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र त्यात प्लास्टिक नसते. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. लहानपणी ऐकलेला हा प्रकार निव्वळ एक अफवा आहे याची नोंद सगळ्यांनीच घ्यावी. आणि चुकीची माहिती पुढे पसरवू नये. असे FSSAI स्पष्ट केले.