भारतीय दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधील 'इंद्रवदन साराभाई' हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. या भूमिकेमुळे घराघरात ओळख मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह आता आपल्यात नाहीत. (His wife has Alzheimer's, Satish Shah struggles to overcome kidney disease! For the love of his wife..)वयाच्या ७४व्या वर्षी मुंबईत त्यांचे किडनी फेल्युअरमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्राने एक हसतमुख कलाकार गमावला, तर प्रेक्षकांनी आपला आवडता इंद्रवदन.
सतीश शाह एक अभिनेता म्हणून उत्कृष्ट होतेच मात्र एक व्यक्ती म्हणून ते किती चांगले होते हे त्यांच्या बरोबर काम करणारा प्रत्येक व्यक्ती कायम मिडियासमोर सांगत आला आहे. मात्र एक आदर्श पती कसा असावा यासाठी त्यांना उत्तम उदाहरण मानणेही योग्यच ठरेल. सतीश शाह यांना किडणीचा त्रास होताच. त्यांनी त्यावर काही उपचार करायचे नाही असे ठरवले होते. मात्र त्यांची पत्नी मधू शाह यांना अल्झायमर नावाचा मेंदूचा आजार झाला, या आजारात हळूहळू स्मरणशक्ती कमी होत जाते. माणूस स्वतःलाही विसरुन जातो. पत्नीला या अवस्थेत सोडायचे नाही म्हणून सतीश शाह यांनी किडणी ट्रान्सप्लांट करुन घेतले. तिची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी सर्जरी करुन घेतली.
मधू शाह सतीश शाह यांच्या पत्नी म्हणून प्रसिद्ध आहेतच मात्र त्या एक यशस्वी फॅशन डिझायनर असून, अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून शांत आणि साधं आयुष्य जगणाऱ्या मधू शाह या त्यांच्या कलात्मक आवडींसाठी ओळखल्या जातात.
अल्झायमर हा असा आजार आहे ज्यामध्ये माणसाला हळूहळू सगळ्याच गोष्टी विसरायला लागतात. सुरुवातीला साध्या आठवणी धूसर होतात, पण नंतर स्वतःची ओळख, जवळची माणसे, दैनंदिन सवयी सगळं विसरायला होतं. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण प्रेम, संयम आणि काळजीमुळे आजारी व्यक्तीला आधार मिळतो. सतीश शाह यांनी या आजाराचा सामना आपल्या पत्नीबरोबर केला. स्वतःचा त्रास सहन करत त्यांनी तिला सोडून दिलं नाही, उलट आयुष्य वाढवण्यासाठी लढा दिला. त्यांची ही कथा केवळ एका अभिनेत्याची नाही, तर एका पतीची आहे ज्याने प्रेमाचा खरा अर्थ जगून दाखवला.
