मुंबईत पहाटेपासूनच कोसळधारा, 'एक्सप्रेस वे'वर वाहनांची भली मोठी रांग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:29 AM2021-06-16T10:29:21+5:302021-06-16T10:44:49+5:30

मुंबईसह एक्सप्रेस वेस्टर्न हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ चक्का जाम झाला आहे

मुंबईत ९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील तीन दिवस हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जाहीर केला. त्यानंतर रविवारी त्यात बदल करून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला.

मुंबई, कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस न झाल्याने हा अलर्ट नागरिकांसाठी होता की पावसासाठी, अशी गमतीदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती.

बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या पावसामुळे रस्त्यावर आणि सखल भागातही पाणी साचलंय.

रविवारी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता, हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ‘रेड ॲलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा रविवारी दिला.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा होता. मात्र, पावसाचे ढग दिसलेच नाही, आज सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

सकाळीच कोसळलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरातील विविध भागात पाणी साचले असून शहरातील ट्रॅफिकही जाम झाले आहे.

मुंबईसह एक्सप्रेस वेस्टर्न हायवेवरही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ चक्का जाम झाला आहे.

शहरासह उपनगरातही पावसाचे आगमन झाल्याने चाकरमान्यांनी पावसात भिजतच मार्गक्रमण करायला सुरुवात केली आहे

मुंबई शहरात 28.55 मिमि पावसाची नोंद झाली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरात सरासरी 18 मिमि पावसाची नोंद झाली आहे.