Aryan Khan: क्रूझ पार्टी ते आर्थरमधून सुटका; आर्यन खानचे ‘ते’ २६ दिवस! पाहा, पूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:20 PM2021-10-30T16:20:35+5:302021-10-30T16:30:36+5:30

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) सुटका झाली.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ची सुटका झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्थर कारागृहातून आर्यन खानची सुटका करण्यात आली.

आर्थर रोड तुरुंगाबाहेर शाहरूख खानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर शाहरुख खानही आर्थर रोड तुरुंगामध्ये आला होता. आर्यन खानला गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, शुक्रवारी जामिनाचे कागद योग्य वेळी तुरुंगात न पोहोचल्याने आर्यन खानची मुक्तता होऊ शकली नव्हती.

अखेर शनिवारी सकाळी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता करण्यात आली. मात्र, न्यायालयाने जामीन देताना आर्यन खानसमोर १४ अटी ठेवल्या असून, यातील एकाही अटीचे पालन न झाल्यास कारवाईचे अधिकार एनसीबीला देण्यात आले आहेत.

शनिवार, ०२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. यानंतर रविवार, ०३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक करण्यात आली.

सुट्टीकालीन विशेष न्यायालयाने आर्यन खानला ०४ ऑक्टोबरपर्यंत पहिली कोठडी सुनावली. यानंतर एसीबीने या प्रकरणी पुढील तपास करण्यास सुरुवात केली. यानंतर ०४ ऑक्टोबर रोजी पुढील तपासासाठी आर्यनला एनसीबी ०७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

यानंतर आर्यन खानला ०७ ऑक्टोबर रोजी मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. या न्यायालयाने आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.

आर्यन आर्थर रोड कारागृहात नेल्यावर कोरोनाच्या नियमावलीनुसार आठवडाभरासाठी आर्यन खानला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यन खानकडून जामिनाची याचिका करण्यात आली. मात्र, ०८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी एनसीबीने यावर जोरदार आक्षेप नोंदवला.

यानंतर आर्यन खानचा जामीन फेटाळण्यात आला. यानतंर ११ ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. यावर एनसीबीने उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. १२ ऑक्टोबर रोजी काही कारवाई करण्यात आली नाही.

१३ ऑक्टोबर जामीन याचिकेवर पुन्हा सुनावणी सुरू झाली. यावेळीही एनसीबीकडून जामिनावर आक्षेप नोंदवण्यात आला. एनडीपीएस कायद्यातील कलम २९ नुसार अशा कटात सामील असणे हा एक गंभीर गुन्हा आहे, अशी माहिती एएसजी अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली.

१४ ऑक्टोबर रोजी जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्या. वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला. यानंतर १५ ते १९ ऑक्टोबरपर्यंत सणासुदीच्यानित्ताने न्यायालय बंद असल्याने आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला.

२० ऑक्टोबर रोजी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आर्यन खानने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार देत या याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्या येईल, असे स्पष्ट केले.

मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालायत सुनावणी सुरू झाली. २७ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाज, मुनमुन यांच्यावतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आणि अखेर २८ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला.

मात्र, नियम व अटींसह न्यायालयाची प्रत मिळून पुढील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २९ ऑक्टोबरचा दिवस निघून गेला. अखेर ३० ऑक्टोबर रोजी आर्यनची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता करण्यात आली.