Sanjay Singh: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलेले संजय सिंह कोण आहेत? पाहा, कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 10:43 PM2021-11-05T22:43:48+5:302021-11-05T22:47:35+5:30

Sanjay Singh: समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास संजय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जाणून घ्या...

मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या अटक झाल्याप्रकरणी वादात सापडलेले एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना एक मोठा दणका देण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना तपासापासून दूर करण्यात आले आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेवर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह (Sanjay Kumar Singh) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

संजय सिंह ओडिशा केडरचे IPS अधिकारी असून, त्यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( NCB) उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आताच्या घडीला ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही पाहिले होते.

संजय सिंह १९९६ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) ओडिसाचे अधिकारी आहेत. ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची दिल्ली एनसीबी कार्यालयात बदली झाली होती.

संजय सिंह यांनी ओडिशा राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ओडिसामध्ये पोलिस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्सचे (डीटीएफ) प्रमुख असताना सिंह यांनी राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली होती.

त्यानंतर संजय सिंग यांना सरकारने बढती देत दिल्ली कार्यालयात बदली केली होती. ओडिशामध्ये अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी ड्रग टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक अंमली पदार्थांचे व्यवहार उघडकीस आणले होते.

एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थ आणि गांजाच्या व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) संजय कुमार सिंग (IPS) यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता.

त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी केल्याचेही समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून समीर वानखेडे यांची दिल्ली झोनमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

Read in English