मुंबईतील ‘हे’ प्रमुख भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार; आयुक्तांच्या भविष्यवाणीनं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:20 PM2021-08-28T17:20:03+5:302021-08-28T17:29:35+5:30

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला धोक्याचा इशारा

गेल्या काही महिन्यांपासून राज्यावर सातत्यानं संकट येत आहेत. अतिवृष्टी, चक्रीवादळं अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना राज्य करत आहे. दरवर्षी राज्यात पूर येत असल्यानं कोट्यवधींचं नुकसान होत आहे.

राज्याची राजधानी मुंबईदेखील सातत्यानं नैसर्गिक संकटांशी दोन हात करत आहे. अतिवृष्टी, पाण्याचा निचरा होत नसल्यानं वारंवार मुंबईची तुंबई होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहाल यांनी केलेल्या भविष्यवाणीनं चिंता वाढली आहे.

नरिमन पॉईंट, कफ परेड, मंत्रालय २०५० पर्यंत समुद्राच्या पाण्याखाली जातील, असा धोक्याचा इशारा चहल यांनी दिला आहे. वातावरणात बदल होत आहेत. तापमानात वाढ होत आहे. त्याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले असल्याचं निरिक्षण चहल यांनी नोंदवलं.

निसर्ग आपल्याला वेळोवेळी इशारे देत आहे. मात्र आपण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. लोकांना वेळीच जाग आली नाही, तर परिस्थिती धोकादायक बनेल, असा इशारा चहल यांनी दिला. मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई शहरातील ए, बी, सी आणि डी वॉर्डातील ७० टक्के भाग हवामानातील बदलांमुळे पाण्याखाली जाईल. त्यामुळे कफ परेड, नरिमन पॉईंट आणि मंत्रालयासारखे परिसर जलमग्न होतील, अशी भविष्यवाणी चहल यांनी केली.

कफ परेड, नरिमन पॉईंट आणि मंत्रालयासारखे परिसर लवकरच पाण्याखाली जातील. आपल्या हाती फारसा कालावधी शिल्लक नाही. कारण हे २५ ते ३० वर्षांतच घडेल. २०५० फार दूर नाही, असं चहल म्हणाले.

आपल्याला निसर्गाकडून, पर्यावरणाकडून वारंवार धोक्याचे इशारे मिळत आहेत. आपल्याला वेळीच जाग आली नाही, तर पुढील २५ वर्षांत परिस्थिती भीषण असेल. पुढल्याच नव्हे, तर आताच्या पिढीलादेखील याचा फटका बसेल, अशी भीती चहल यांनी बोलून दाखवली.

मुंबईत गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांचा संदर्भ चहल यांनी दिला. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. १२९ वर्षांत प्रथमच मुंबईत चक्रीवादळ आलं. त्यानंतर १५ महिन्यांत तीन चक्रीवादळं येऊन गेल्याचं चहल यांनी सांगितलं.

५ ऑगस्ट २०२० रोजी नरिमन पॉईंट परिसरात ५ ते ५.५ फूट पाणी साचलं होतं. त्या दिवशी चक्रीवादळ येईल असा कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आला होता. पण निकष पाहिल्यास परिस्थिती चक्रीवादळासारखीच होती, असं चहल म्हणाले.

Read in English