Join us

मनधरणी करण्यात NCP अपयशी? आता BJP प्रवेश करणार का? CM फडणवीस भेटीनंतर भुजबळांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:56 IST

NCP AP Group Mla Chhagan Bhujbal News: मंत्रीपद गेल्याने अतिशय नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. काही समर्थकांनी भाजपासोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

NCP AP Group Mla Chhagan Bhujbal News: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत. एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी समीर भुजबळ हेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. 

मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत अनेक गोष्टींची चर्चा झाली. काय काय घडले, काय काय सुरू आहे, यावर चर्चा केली. वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच आपल्याला मान्यच केले पाहिजे की, महायुतीला महाविजय मिळाला, त्यात ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात होते. ओबीसी समाजाचा या विजयात मोठा वाटा आहे. इतर घटकांचाही वाटा आहेच. परंतु, विशेष करून ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबाबत आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थिती ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाहीत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपामध्ये प्रवेश करणार का?

राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपामध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी छगन भुजबळ यांना केला. यावर बोलताना, मी यापेक्षा जास्तपेक्षा काही सांगू शकत नाही. यापूर्वी मी सगळे काही बोललो आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी प्रश्नाला बगल दिली. तसेच राज्यात ज्या घडमोडी सुरू आहेत, त्याची कल्पना आहे. मुलांना शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि वेगळे वातावरण आहे. एक आठ ते दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ ते दहा दिवसांनंतर आपण पुन्हा भेटू, बोलू. निश्चितपणे चांगला मार्ग यातून शोधू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. माझी आपल्याला एक विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा की, मी यावर साधक-बाधक विचार करतो आहे. हा निरोप ओबीसी घटकांनी द्या. आपण शांततेने घेऊया. दहा ते बारा दिवसांमध्ये चांगला मार्ग काढता येईल. यावर चर्चा करूया, असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ०३ जानेवारी रोजी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट होऊ शकते, असे वृत्त माध्यमांमध्ये आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मीडियाने प्रश्न विचारला. यावर बोलताना, तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असे सांगत अजित पवार यांनी एका वाक्यात विषय संपवला. 

टॅग्स :छगन भुजबळदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहायुती