भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:45 IST2019-03-14T16:45:01+5:302019-03-14T16:45:41+5:30

 लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असताना भाजप व शिवसेनेकडून निवडणूक आयोगाने लादलेल्या आचारसंहितेचा वारंवार भंग केला जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केला.

The violation of the Code of Conduct by the BJP and Shivsena - Sanjay Nirupam | भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप

भाजप आणि शिवसेनेकडून होतोय आचारसंहितेचा भंग, संजय निरुपम यांचा आरोप

 मुंबई - लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असताना भाजप व शिवसेनेकडून निवडणूक आयोगाने लादलेल्या आचारसंहितेचा वारंवार भंग केला जात आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केला. संजय निरुपम पुढे म्हणाले की, एकदा का निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले की, निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार निवडणूक लढवणाऱ्या सर्व पक्षांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या सर्व प्रतिमा व फलक, पक्षांच्या जाहिरातीचे फलक, तसेच सर्व राजकीय कार्यक्रमांचे फलक काढून टाकणे किंवा झाकून ठेवणे सर्व पक्षांसाठी बंधनकारक आहे, तसा नियमच आहे. पण असे असताना सुद्धा सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेनेचे जाहिरातींचे फलक, त्यांच्या नेत्यांच्या जाहिरातींचे फलक आजही मुंबई शहरामध्ये व उपनगरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाजप व शिवसेनेने उघडपणे निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केलेला आहे.  

संजय निरुपम पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने नेमलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन हे सत्ताधारी पक्षाने केलेच पाहिजे. पण ५ वर्षे सत्तेत असून सुद्धा भाजप व शिवसेना  जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण करू शकली नाहीत. लोकांनी त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांना मत देण्याजोगे भाजप आणि शिवसेनेकडे सांगण्यासारखे काहीच नाही. जनता सुद्धा त्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळली आहे. ५ वर्षे सत्तेत राहून सुद्धा जनतेला योग्य सरकार देण्यात भाजप व शिवसेना अपयशी ठरले आहेत आणि म्हणूनच आचारसंहिता सुरु असताना सुद्धा पक्षाचे फलक किंवा जाहिराती दाखवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप व शिवसेना करत आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना व  भाजपला कोणतीही विशेष सवलत न देता, त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. 

Web Title: The violation of the Code of Conduct by the BJP and Shivsena - Sanjay Nirupam