विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 09:08 IST2018-09-15T09:07:53+5:302018-09-15T09:08:25+5:30

दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे. 

Vijay Mallya is a liar; Uddhav Thackeray support to Arun Jaitley | विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

मुंबई : भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी देश सोडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, असे विधान विजय माल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले होते. अरुण जेटली आणि विजय माल्ल्या भेटीवरुन सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. यावर विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत  'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे. 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि माल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
बँकांनी कर्जे द्यायची, ती बुडवायला पोषक वातावरण निर्माण करायचे व उद्योगपतींना पळवून लावले की पुन्हा त्यांच्या प्रत्यार्पणाचे ढोल वाजवायचे. माल्ल्या हा आता आर्थिक विषय राहिला नसून राजकीय धोपटेगिरीचा विषय झाला आहे. माल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात सांगितले की, ‘‘बँकांचे आपल्यावर कर्ज होते. थकबाकी भरायला आपण तयार होतो. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकदा पत्र लिहिले होते, परंतु मला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकांशी तडजोड करावी यासाठी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती.’’ मल्ल्याच्या या विधानानंतर इतकी खळबळ उडायचे कारण काय? अशा प्रकारच्या भेटी होऊ शकतात व हे काँग्रेसला माहीत असायला हवे. ज्या पक्षात मनमोहन सिंग यांच्यासारखे जोरदार अर्थतज्ञ आहेत त्यांचा सल्ला तरी काँग्रेसने घ्यायला हवा होता, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर केला आहे. 
तडजोडीचा मसुदा माल्ल्याने दिला होता व बँकांना तो मान्य नव्हता. त्यामुळे अर्थमंत्र्यांकडे दाद मागितली असे हे प्रकरण आहे. पुन्हा माल्ल्या अर्थमंत्र्यांना भेटला तो संसदेच्या दालनात. माल्ल्या हा खासदार होता व खासदार म्हणून तो संसदेत कुठेही वावरू शकत होता. संसद सदस्याचा तो हक्क आहे. त्यामुळे संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आपण माल्ल्या याला अरुण जेटली यांच्याशी बोलताना पाहिले होते, म्हणून जेटली हे माल्ल्या प्रकरणातील एक गुन्हेगार आहेत असे जेव्हा काँग्रेसचे एक पुढारी पुनिया सांगतात तेव्हा हसू आवरत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Web Title: Vijay Mallya is a liar; Uddhav Thackeray support to Arun Jaitley