'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:02 IST2025-01-21T19:02:10+5:302025-01-21T19:02:53+5:30
देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आढळून येत असून, यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

'चोराच्या उलट्या बोंबा'; आदित्य ठाकरेंवर भाजपचा पलटवार, अमित शाहांचा व्हिडीओ केला शेअर
'केंद्र आणि राज्यातील सरकार किती अपयशी ठरलं आहे, याचं मोजमाप तुम्ही करू शकता', असे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री शाह आणि राज्यातील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला आता भाजपने उत्तर दिलं आहे.
"जर एखादा बांग्लादेशी आपल्या राज्यात, शहरात येऊन हल्ला करतो; तर भाजपचं केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो किती अपयशी ठरलंय ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारवर केली.
अमित शाहांचा व्हिडीओ दाखवत, भाजपचे ठाकरेंना उत्तर
मुंबई भाजपने आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील बांगलादेश संदर्भातील उत्तराचा भाग पोस्ट केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत भाजपने म्हटले आहे की, "चोराच्या उलट्या बोंबा... देशाच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्या साथीदार ममता बॅनर्जी यांना बांगलादेशी घुसखोरांच्या विषयी प्रश्न विचारा! भारतनगर येथील अवैध झोपडपट्टीमध्ये कारवाई होत असताना त्यांना वाचवण्याठी सरसावलेले आदित्य ठाकरे आज देशातील सर्वात कणखर गृहमंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत?", असा उलट सवाल करत भाजपने आदित्य ठाकरेंना घेरलं.
चोराच्या उलट्या बोंबा...
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) January 21, 2025
देशाच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तुमच्या साथीदार @MamataOfficial यांना बांगलादेशी घुसखोरांच्या विषयी प्रश्न विचारा! भारतनगर येथील अवैध झोपडपट्टीमध्ये कारवाई होत असताना त्यांना वाचवण्याठी सरसावलेले @AUThackeray आज देशातील सर्वात कणखर… https://t.co/eGBJKKrhSBpic.twitter.com/HU1Xf09Hqs
केंद्र सरकारवर आदित्य ठाकरेंनी केली होती टीका
आदित्य ठाकरे म्हणालेले की, "केंद्र सरकारने आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी किती बांग्लादेशींना परत बांग्लादेशात पाठवले ह्याची आकडेवारी जाहीर करावी. दहा वर्षात भाजपचे अपयश समोर आलेलं आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशी घुसताहेत", अशी टीका ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली होती.